मुंबई : पाच वर्षे एकमेकांवर यथेच्छ टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सूर पुन्हा जुळताना दिसतायेत. त्यातच राष्ट्रवादीचे शरद पवार अचानक संघाची स्तुती करायला लागले. त्यामुळे हे हृदयपरिवर्तन आहे कि एका नव्या तडजोडीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे, असा प्रश्न प्रसिद्ध वक्ते आणि प्रवचनकार विवेक घळसासी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘संघ’ ही राष्ट्रकारण करणारी शक्ती असल्याचे समजल्यामुळे शरद पवारांनी कौतुक केले असावे.
स्व. विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या समारंभात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी विचारलेल्या राजकीय प्रश्नांना त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये फेक नरेटीव्ह तयार करण्यात मविआला यश आले. त्यामुळे त्यांना एक ओव्हर कॉन्फिडन्स आला कि आपण अशा प्रकारचा फेक नरेटीव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेमध्ये येवू शकतो. आम्हालाही तो धक्का होताच. आम्ही सुद्धा म्हणजे माझ्या सहित सर्व जण ओवर कॉन्फिडन्समध्ये होतो. आम्ही जिंकतोच आहे असे आम्हाला वाटत होते. संविधान बदलणार, व्होट जिहाद सारख्या अशा गोष्टींमुळे लोकांवर याचा परिणाम होणार नाही अशी आम्हाला खात्री होती. पण याचा असर झालेला आम्ही बघितला.
🕖 संध्या. ६.५५ वा. | १०-१-२०२५📍नागपूर.
LIVE | जिव्हाळा पुरस्कार 2025#Maharashtra #Nagpur https://t.co/T47vl6NVha
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 10, 2025
त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला आम्ही विनंती केली कि राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा तुमचा प्रांत नाही. पण आताची परिस्थिती अशी आहे कि अराजकतावादी ज्या ताकदी, शक्ती आहेत. या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय विचारांच्या ज्या शक्तीं आहेत कि ज्यांचा मूळ विचार, परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आहे. अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचे आहे म्हणून आपआपली भूमिका आपआपल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली. त्यामुळे फेक नरेटीव्ह तयार झालेल्या फुग्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल पूर्णपणे वेगळे लागले किमान विधानसभेत मविआ धुवून निघाली.
आम्ही प्रत्येक ‘वारां’चा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत – मुख्यमंत्री
शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल कि एवढे मोठे आम्ही तयार केलेले वायुमंडल हे एका मिनिटात पंक्चर कसे झाले, हे करणारी शक्ती कोण?. मग त्यांना लक्षात आले कि ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाहीये तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी प्रतिस्पर्ध्याचे कधीतरी कौतुक करावे लागते म्हणून शरद पवारांनी कौतुक केले असावे असे मला वाटते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज की उद्धव?
संपूर्ण प्रकट मुलाखतीत राजकारणात काहीही शक्य असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी वारंवार जोर दिला. सरतेशेवटी रॅपिड फायर (झटपट उत्तरे) प्रश्नांमध्येही त्यांनी परिपक्व राजकीय नेत्याचे दर्शन घडवले. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? या प्रश्नाला त्यांनी अतिशय चाणाक्षपणे उत्तर दिले. राजकारणात काहीही पक्के नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले. आता राजही मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, असे म्हणत संवादाचा मार्ग आपल्यावतीने सुरू असेल असे संकेत त्यांनी दिले.
अजित पवार की एकनाथ शिंदे?
अजित पवार की एकनाथ शिंदे, असा प्रश्न विचारला असता, दोघांशीही चांगले संबंध असल्याचे फडणवीस म्हणाले. शिंदेसाहेबांशी आणि माझी जुनी मैत्री आहे आणि अजितदादांमध्ये राजकीय परिपक्तता असल्यामुळे त्यांचे आणि माझे सूर जुळतात, असे फडणवीस यांनी सांगितले.