बुलढाणा जिल्ह्यात केसगळतीची भीषण समस्या
बुलढाणा : अवघ्या तीन दिवसांत टक्कल पडत असल्याने (Buldhana Hair Loss) केसगळतीच्या या गंभीर समस्येमुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळतीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत डोक्यावरचे केस गळून टक्कल पडत असल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
अज्ञात आजाराचा फैलाव
बोंडगाव, कालवड, आणि हिंगणा या गावांमध्ये हा अज्ञात आजार वेगाने पसरत आहे. या आजाराची लक्षणे गंभीर असून, आधी डोक्याला खाज सुटते, नंतर हातात केस गळून येतात, आणि तिस-या दिवशी पूर्णतः टक्कल पडते. विशेष म्हणजे, या आजाराचा लहान मुले आणि महिलांवरही मोठा परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये भीती अधिक वाढली आहे.
Dombivli Girl Abused Case : पित्याच्या कुशीतही ‘ती’ असुरक्षितच!
जलप्रदूषणाचा संशय
नदीच्या पाण्याचा दैनंदिन उपयोग करणा-या या गावांमध्ये केसगळती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जलप्रदूषण हे संभाव्य कारण मानलं जात आहे. मात्र, काही डॉक्टरांचा अंदाज आहे की रसायनयुक्त शाम्पूमुळेही हा प्रकार होऊ शकतो. आश्चर्य म्हणजे, शाम्पू न वापरणा-या नागरिकांनाही हा त्रास होत असल्याने, यामागे एखाद्या अज्ञात विषाणूचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
या प्रकारामुळे नागरिक खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत, मात्र अद्याप या आजाराचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
सरकारच्या कारवाईकडे अपेक्षा
शिवसेना शाखाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला निवेदन देऊन गावांमध्ये त्वरित उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होण्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
HMPV विषाणूचे सावट आणि नवीन व्हायरसची शक्यता?
एकीकडे राज्यात HMPV (ह्युमन मेटा-प्यूमोनिया व्हायरस) मुळे सरकार अलर्ट मोडवर आहे. नागपूरमध्ये या विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे टास्कफोर्स स्थापन केली गेली आहे. परंतु बुलढाण्यातील केस गळतीच्या या अज्ञात समस्येमुळे नवीन विषाणूचा संशय व्यक्त केला जात आहे.
नागरिकांची मागणी
कालवड, बोंडगाव, आणि हिंगणा या गावांमध्ये आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. आरोग्य विभागाने या विचित्र समस्येचे नेमके कारण शोधून त्वरित उपचार सुरू करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
सरकारने वेळेत लक्ष न दिल्यास ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते. बुलढाण्यातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.