मुंबई : उद्धव गटाला पक्ष फुटण्याची भीती सतावत आहे. नव्या वर्षाची सुरुवात होत नाहीत तोच कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकटे राजन साळवीच नाही तर आणखी काही जण शिवसेना किंवा भाजपात प्रवेश करणार आणि उद्धव गटाला कायमचा ‘जय महाराष्ट्र’ करणार अशीही चर्चा आहे.
निवडणूक आयोगाने घोषणा केली नसली तरी एप्रिल – मे २०२५ मध्ये मुंबई – ठाण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुकांची शक्यता आहे. या निवडणुकांची घोषणा झाल्यास उद्धव गटातील अनेकजण सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानसभेत ५७ आमदार निवडून आले तर उद्धव गटाचे २० आमदार निवडून आले. उद्धव गटाचे बहुसंख्य आमदार हे मुंबईतले आहेत. यामुळे राज्याच्या उर्वरित भागातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचेच नेतृत्व मान्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाची सुरुवात होताच उद्धव गट फुटणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. उद्धव गटात असलेले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. उद्धव गटाचे वेगवेगळ्या शहरांतील माजी नगरसेवक भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षांतर करणार असल्याचे वृत्त आहे.