खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात (Santosh Deshmukh murder case) आली. या घटनेला १९ दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेवरून राजकारण देखील तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशी झाली पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एका सुरात या प्रकरणी वाल्मीक कराड याला अटक करण्याची व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी ‘आरोपींना शिक्षा होईपर्यंत लढा देणार आहे. तुम्ही आज माझ्या कुटुंबासोबत मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तसेच माझ्यासोबत राहा’ अशी भावना व्यक्त केली.
या घटनेचा मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे विरोधक-सत्ताधारी यांच्यात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशा मागण्या केल्या जात आहेत. दरम्यान देशमुख यांचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून जोर धरत आहे.
Badlapur Crime : मैत्रीला काळीमा! आधी मैत्रिणीला बियर पाजली शुद्ध हरपल्यानंतर…
देशमुख यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बीडमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खासदार संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील, भाजपाचे आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, इत्यादी नेते सहभागी झाले होते.
देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधी तज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधी तज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, त्याचप्रमाणे राजकीय हस्तक्षेपामुळे देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळू देणार नाही, यासाठीच हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बीडचा मोर्चा आहे तो सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. त्यांच्या मुलीला, त्यांच्या आईला, पत्नीला, त्यांच्या भावाला, न्याय देण्यासाठी या मोर्चाचा आयोजन केले आहे. या मोर्चाला बीडसह राज्यभरातून जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सर्व संघटना आलेल्या आहेत. आम्ही दोन दिवसाचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. त्यांनी दोन दिवसामध्ये मोर्चापूर्वी वाल्मिक कराडला आणि त्याच्या गुंडांना ताब्यात घ्यायला सुरुवात करायला पाहिजे होती. सरकार कारवाई केल्यासारखं दाखवते, पण अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत. आज १९ दिवस झाले आहे तरी या प्रकरणातील सूत्रधार मोकाट फिरतो आहे. आमच्या सर्वांचा एकच म्हणणं आहे. या मोर्चातून सरकारने धडा घ्यावा, बोध घ्यावा आणि तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक करावी. त्याचबरोबर ही टोळी चालवणारा आणि टोळीतला एका-एका लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, ते कधी लावणार असा प्रश्न आहे. तो जो वाल्मिक कराड आहे, त्याला प्रमुख आरोपी करा आणि जितके आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण चालवा, अशी आमची मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. यामध्ये वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी उज्वल निकम आणि सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी. हे प्रकरण बीडमध्ये न ठेवता हे प्रकरण मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावे, कारण बीडमध्ये जर हा खटला चालवला तर राजकीय हस्तक्षेप होईल आणि या कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि यासाठी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे, सरकारने तात्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा, अन्यथा याच्या परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.