
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सातत्याने लक्ष्य करणारे भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पोलीस अधीक्षकांकडे आपली चिंता व्यक्त केली. महादेव बेटिंग ऍपच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप धस यांनी केला आणि त्याच्या चौकशीची मागणी केली.
धस यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघातील टेंभुर्णी गावात एका व्यक्तीच्या खात्यातून ९ अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार असल्यास ईडीकडून चौकशी होण्याची पद्धत आहे. इथे ९०० कोटी रुपयांचे प्रकरण आहे, त्यामुळे यावर ईडीची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच, या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं धस यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आणि सांगितले की, चांगलं काम करणारे अधिकारी बाजूला सारले गेले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले. महादेव बेटिंग ऍप प्रकरणातसुद्धा आकाचा हात असावा, असा संशय आमदार धस यांनी व्यक्त केला.

सोलापूर : 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगलाच रूढ आहे. सध्या सोलापूर विमानतळाचेही (Solapur airport) कामकाज या वाक्प्रचाराप्रमाणे ...
धस यांनी पुढे दावा केला की, बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर सारख्या घटनांचा उगम झाला आहे. "बीडजवळ अनेक जमिनींच्या खरेदीची माहिती समोर येत आहे. परळी बाजार समितीच्या गाळ्यांचं उद्घाटन तीन वर्षांपासून लांबले आहे, कारण ते गायरान जमिनीवर उभारले आहेत. आकाच्या कार्यकर्त्यांनी १४०० एकर गायरान जमीन बळकावली आहे आणि त्यावर ६०० वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत, त्यातील ३०० अनधिकृत आहेत," असे धस यांनी म्हटले. आकांचे असे उद्योग आता हळूहळू पुढे येऊ लागले आहेत,' अशा शब्दांत धस यांनी आकांची कुंडलीच मांडली.
याशिवाय, धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, "धनुभाऊ, तुमचं विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे. आमचं लेकरु गेलं आहे, त्याला न्याय द्यायचा आहे. तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतोय, ही काही राजकीय बाब नाही. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक आणि मुस्लिम लोक देखिल सहभागी होणार आहेत," असे ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात 'आकां'ची १०० ते १५० एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत ३० ते ४० कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. 'आकां'कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? असा सवालही धस यांनी केला आहे.