Saturday, June 21, 2025

Maharashtra Politics : दिल्लीत PM मोदींसोबत शिंदेंची भेट, एक तास चर्चा; शिंदेंनी सांगितलं

Maharashtra Politics : दिल्लीत PM मोदींसोबत शिंदेंची भेट, एक तास चर्चा; शिंदेंनी सांगितलं

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील झालं आहे. आता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम राहिला आहे. तो कार्यक्रमही पुढच्या दोन-चार दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाची कामे हाती घेत आहेत. असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न सर्वानांच पडला आहे. या भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नसतं. त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.



एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया


“ही भेट खरं म्हणजे कुठलीही राजकीय नव्हती. सदिच्छा भेट होती. सरकारने केलेल्या कामांची पोचपोवती महाराष्ट्राची जनता देईल. तशी पोचपावती महाराष्ट्राच्या जनतेने दिली म्हणून तशी सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली. मोदींनी सुद्धा सांगितलं की, महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही. केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण जसे आपल्या पाठिशी उभे होतो तसे यापुढे देखील पाठिशी आहोत”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


“मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री किरण रिज्जू यांची भेट घेतली. ही फक्त सदिच्छा भेट होत होती. अडीच वर्षात आम्ही लोकाभिमुख सरकार काय असतं ते दाखवलं आणि लोकांनी आम्हाला मान्यता दिली. केंद्र सरकारचं आमच्यामागे पाठबळ उभं होतं. आता आमची नवीन इनिंग सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कसा होईल? याचा विचार करु. महाराष्ट्रात क्षमता आहे. केंद्रातील अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सर्वांची भेट घेणार आहोत”, अशी देखील माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.




वन नेशन वन इलेक्शन होणं गरजेचं


“सतत होणाऱ्या निवडणूकांमुळे विकास थांबला जातो. देशाची प्रगती होण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन होणं गरजेचं आहे. एनडीएची बैठक होती. त्यामुळे त्यांचे पूर्व नियोजीत कार्यक्रम होते. ते मीटिंगला आले नाही. एनडीए मजबूत आहे. आम्ही इंडिया अलायन्स प्रमाणे स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment