शिर्डी महोत्सवाची संस्थानच्या वतीने जय्यत तयारी
शिर्डी : २०२४ या सरत्या वर्षाला निरोप आणि २०२५ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत (Sai temple) लाखो भाविक येणार असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३१ डिसेंबर रोजी रात्री साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत चार दिवसीय शिर्डी महोत्सव साजरा करण्यात येणार असून, या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ अखेर ४ दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील साई संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
OMG : अरे देवा! हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा कहर! हजारो पर्यटक अडकले; ४ जणांचा मृत्यू
नवीन वर्षानिमित्ताने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच शिर्डी महोत्सवाकरिता राज्यासह देशातील अनेक भागातून ९० पायी पालख्या येणार असल्याची नोंदणी भाविकांनी केलेली आहे. या महोत्सवाकाळात साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता सुमारे १२० क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकिटे आणि सुमारे ४०० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटे तयार करण्यात आली आहेत. तसेच उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन दर्शन रांग, श्रीसाईनाथ मंगल कार्यालय, द्वारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्प्लेक्स, गेट नंबर ४ चे आतील बाजू, श्रीसाईप्रसादालय, सेवाधाम इमारत व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत.
शेजारती, काकड आरती होणार नाही
थर्डी फर्स्टच्या दिवशी साई समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार असल्यामुळे रात्री १० वाजता साईंची होणारी शेजारती आणि १ जानेवारी रोजी पहाटेची ५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही, असेही साईबाबा संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. नाताळच्या सुट्ट्यामुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली असून, लाखांहून अधिक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांना साई दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहेत.