Tuesday, May 6, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

BJP Strategy : मुंबई जिंकण्यासाठी भाजपाने आखली रणनिती!

BJP Strategy : मुंबई जिंकण्यासाठी भाजपाने आखली रणनिती!

मुंबई जिंकण्यासाठी भाजपा वापरणार मतदार नोंदणीचा फॉर्म्यूला


महापालिका जिंकण्यासाठी निवडणूक तयारीचा घेतला आढावा


मुंबई : विधानसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी करणाऱ्या भाजपाने आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी (BJP Strategy) सुरु केली आहे. त्यासाठी बुधवारी मुंबई भाजपाची बैठक झाली. या बैठकीला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. त्यांच्याच अध्यतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती भाजपाचे आमदार अमित साटम यांनी दिली.


भाजपामध्ये एक व्यक्ती आणि एक पद असा नियम आहे. आशिष शेलार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. मंत्रिपद स्वीकारल्याने शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. पण या बैठकीत अध्यक्षपदाबद्दलचा कोणताही निर्णय झालेला नाही.


/>

भाजपाच्या बैठकीनंतर अमित साटम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबई महापालिकेचा पुढील महापौर महायुतीचाच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणार आहे. निवडणुकीत मतदानावेळी जसे टेबल लावले जातात, तसे मॉक टेबल्स, बूथ, स्टॉल्स ५ जानेवारीला मुंबईत लावण्यात येतील. मतदार नोंदणीवर जास्त भर दिला जाईल, असे साटम यांनी सांगितले.


२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी सुमार झाली. त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या. पण लोकसभेनंतर अवघ्या ६ महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल १३२ जागा जिंकल्या. या कालावधीत तब्बल ४० लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली. निवडणुकीत भाजपला झालेले मतदान पाहता, ही नोंदणी सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडल्याचे दिसत आहे.



भाजपाने लावली ताकद पणाला


लोकसभेला महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख १५ हजार ८१९ मते पडली होती. तर महायुतीला २ कोटी ४८ लाख १२ हजार ६२७ मतदान झाले. विधानसभेला मात्र महायुतीने सुसाट कामगिरी केली. त्यांना ३ कोटी १८ हजार ४९ हजार ४०५ मतं पडली. तर मविआला २ कोटी २७ लाख १० हजार २२० मतदान झालं. मविआची मते २३ लाखांनी घटलेली असताना महायुतीची मतं ७० लाखांनी वाढली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या मतदार नोंदणीचा फायदा महायुतीला झाला. त्यामुळे आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपा हाच फॉर्म्युला वापरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या मुंबई महापालिकेवरील वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपाने ताकद पणाला लावली आहे.

Comments
Add Comment