
मुंबई : महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. तर अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि गिरीश महाजन यांच्याकडे डे जलसंपदा विभागाची धुरा देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे प्रताप सरनाईक फडणवीस सरकारमध्ये परिवहन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिवहन विभागासाठी भरतशेठ गोगावले यांनी मागणी केली होती मात्र त्यांच्या जागी प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना फक्त गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचा कारभार देण्यात आला आहे. विखे पाटील यांचे महत्त्व नव्या मंत्रिमंडळात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभाग हे महत्वाचे खाते देण्यात आले आहे आणि पहिल्यांदा मंत्री झालेले प्रकाश आबिटकर यांना आरोग्य सारखे मोठे खाते मिळाले आहे. तर दादा भुसे हे आता नवीन शिक्षण मंत्री असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभाग देण्यात आले आहे.
तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा, गणेश नाईक यांच्याकडे वन, संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, .मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन, उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल यांच्याकडे विपणन, प्रोटोकॉल, पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन, अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर, अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय, शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास, माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी विभाग, जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास, पंचायत राज, नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय, भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी,फलोत्पादन विभाग देण्यात आले आहे.