मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सभागृहात अभिनंदन केले. ते म्हणाले की, मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या १२ कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपली निवड झाली. त्याबद्दल विरोधी पक्षाचे सदस्य आणि गटनेत्यांचे आभार मानतो. राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता, तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला, या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल शंका नाही, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे ॲड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष असतील. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे १९६२ आणि १९६७ असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. सयाजी सिलम हेही दोन वेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळाले आहे.