नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या डे-नाईटच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने रविवारी १० गडी राखून शानदार विजय नोंदवला. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १९ धावांचे माफक लक्ष्य दिवसाच्या पहिल्या सत्रातच ३.२ षटकांत कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले. पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव अवघ्या १७५ धावांत आटोपला. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, हा आठवडा आमच्यासाठी निराशाजनक होता, पुरेसा खेळ केला नाही.
IND vs AUS: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा लाजिरवाणा पराभव
रोहित शर्मा म्हणाला की, ‘आमच्यासाठी हा एक निराशाजनक आठवडा होता, आम्ही खेळ जिंकण्यासाठी पुरेसा चांगला खेळ केला नाही आणि ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. खेळात अशा अनेक संधी आल्या जेव्हा आम्हाला त्या संधींचा फायदा उठवता आला असता पण आम्ही ते करण्यात अपयशी ठरलो आणि त्यामुळे आम्हाला खेळ गमवावा लागला. आम्ही पर्थमध्ये जे केले ते खूप खास होते, आम्हाला येथे येऊन ते पुन्हा करायचे होते; पण प्रत्येक कसोटी सामन्याची स्वतःची आव्हाने असतात. गुलाबी चेंडूने खेळणे आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहीत होते.असे त्याने म्हटले.