नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुण हे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड ते खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावर चाकू हल्ला केला व खेरवाडी रेल्वे स्थानकावर चैन पूलिंग करून पळ काढला. संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे राज्यराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकात खोळंबल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उद्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातील लाखो अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात पाच तारखेपासूनच हे सर्व जण यायला सुरुवात होते. मराठवाडा येथील काही तरुण आज राज्यराणी एक्सप्रेसने जात असतानाच निफाड ते खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले त्यांना विरोध केला असता त्यांनी या तरुणांवर चाकूने हल्ला केला. यात तरुण जखमी झाले आहेत. मात्र, या सगळ्या गडबडीत या चोरट्यांनी खेरवाडी स्थानक येताच चैन पूलिंग केली व पळ काढला. मात्र, संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे या स्थानकात राज्यराणी सेवाग्राम या गाड्या खोळंबल्या. यामुळे रोज अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आरपीएफची प्रवाशांना विनंती…
या सगळ्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी माहिती घेतली व प्रवाशांना विनंती केली की सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. आपण फक्त रेल्वे जाऊ द्या. मात्र, प्रवाशांनी याला जोरदार विरोध केला. यामुळे मुंबईकडे जाणारी राज्यराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या खोळंबल्या होत्या.