मुंबई : महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. नेमकी कुणाच्या सांगण्यावरून ही राष्ट्रपती राजवट लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. जी राष्ट्रपती राजवटी राज्यात लागू झाली ती शरद पवार यांच्या पत्रामुळे लागू झाली, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकेठिकाणी बोलताना म्हटलं. यानंतर एका मराठी मुलाखतीत शरद पवार यांनी मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टीका केली. आता त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले होते?
फडणवीस यांचा मी आभारी आहे. त्यावेळी मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही की, राष्ट्रपती राजवट मी सांगितल्यावर लागते. याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की, माझं राजकारणात स्थान काय आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टिपण्णी केली होती. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, “१० नोव्हेंबरआधी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्यावेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीमध्ये हेसुद्धा ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू. त्यादरम्यान, राज्याचा दौरा शरद पवार करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच दिलेल्या सूचनेनुसार ठरलं होतं.”
राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतचा किस्सा सांगताना फडणवीस यांनी म्हंटल, “राज्यपालांनी शिवसेना, भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. माझ्याच कार्यालयात ते पत्र टाईप करण्यात आलं होतं. पवार साहेबांनी पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर शरद पवार साहेब म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, प्रत्यक्षात बघाल तर त्यांच्याचं पत्रामुळे ती लागू झाली.”