लता गुठे
अधिक मासच्या दरम्यान बीडला गेले असता पुरुषोत्तम मंदिराबद्दल माहिती मिळाली. अधिकचा महिना असल्यामुळे अनेक लोक पुरुषोत्तम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. हे मंदिर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमच्या दर्शनासाठी महिनाभर भाविकांची प्रचंड मोठी गर्दी असते. भारतातील भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर पुरुषोत्तमपुरी येथेच का आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. अधिक मासात या गावात मोठी यात्रा भरते, ही यात्रा महिनाभर चालते. या यात्रेत भारतभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. पुरुषोत्तमपुरी हे गोदावरी नदीकाठी तेराव्या शतकातील आहे. तेराव्या शतकात राजा रामदेवराय यांच्या काळात हेमाडपंथी बांधकाम असलेले मंदिर आहे. ते दगड-विटांनी बांधलेले असून या बांधकामातील विटा पाण्यावर तरंगतात हे आश्चर्य आहे. पुरुषोत हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे महात्म्य असल्याने या गावास वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. अधिक मास हा धार्मिक व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. दानधर्म, धार्मिक विधी, पूजापाठ या महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असतात. धोंडा महिना, पुरुषोत्तम मास या नावांनीही हा महिना ओळखला जातो. भगवान पुरुषोत्तमाची पूजा या महिन्यात मोठ्या प्रमाणात होते.
पुरुषोत्तमपुरी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे नदीकाठापासून शंभर मीटर अंतरावर विष्णूचा अवतार-भगवान पुरुषोत्तमाचे हेमाडपंती मंदिर पूर्वाभिमुख असून आतील गाभाऱ्यात काळ्या पाषाणात भगवान पुरुषोत्तमाची उभी मूर्ती हाती शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेली तीन फूट उंचीची आहे. पुरातन काळात या परिसरात दंडकारण्य होते. तेथे शार्दूल नावाचा राक्षस रयतेला त्रास देत असे. भगवान विष्णूने पुरुषोत्तमाचा अवतार धारण करून आपल्या हातातील चक्राने राक्षसाचा वध केला व ते चक्र गोदावरी नदीत धुऊन काढल्याने या तीर्थाला चक्रतीर्थ असे नाव पडले. आजही मंदिरापासून समोरच गोदावरी नदी व चक्रतीर्थाचे सुंदर व विलोभनीय अशा दृश्याचे दर्शन होते. ‘धोंडे महात्म्य’ या पवित्र ग्रंथात उल्लेखलेल्या बारा महिन्यांना बारा भगवंत स्वामी आहेत. मात्र, सर्वांचा मिळून बनलेल्या अधिक मासाचे स्वामित्व कोणीच स्वीकारत नसल्याने ते पुरुषोत्तमाने स्वीकारले. त्यामुळे दर तीन वर्षांनी येणारा अधिक मासात (धोंड्याचा महिना) पुरुषोत्तम दर्शनास महत्त्व आहे. त्रिवेनी संगम मंदिर म्हणून संबोधले जाते या मंदिराची विशेषत: म्हणजे वरदविनायक गणपतीची ४ फूट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि सहालक्षेश्वर शंकराची शिव पिंड, असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात इतरत्र शोधूनही सापडत नाही. या मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिमा म्हणजे वृंदावनातील कृष्णमंदिराची प्रतीकृती आहे.
अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर देशातील विविध भागातून ५ ते ६ लाख भाविक गर्दी करतात. परिवहन मंडळाच्या बस, ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांनी भाविक येतात. या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने गावापासून अलीकडे ३ किमी दूर पार्किंग व्यवस्था करण्यात येते. स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना नक्कीच पाहाण्याजोगा आहे. असे म्हणतात की, इ.स. १३१० मध्ये रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले असा काही ठिकाणी उल्लेख आहे. रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले, त्यामुळेच या मंदिराचे नाव ‘पुरुषोत्तम पुरी’ असे पडले. इतिहासाच्या दृष्टीने विचार करता, तुम्हाला येथे अनेक प्राचीन गोष्टींचा अनुभव येईल. रामचंद्र यादवांचा ज्ञात ताम्रपट येथेच सापडला आहे.
ऐतिहासिक ताम्रपटांवरील – जे ताम्रपट सध्या हैदराबाद इथल्या उस्मानिया विद्यापीठात जतन केलेले आहेत. मजकुरावरून यादव कुळातील राजा रामचंद्र यांनी (१२७१ ते १३१२) त्यांचा मंत्री पुरुषोत्तम यास जमीन दान करण्याचे आदेश दिल्याचा उल्लेख आहे. यावरून या मंदिराचे महत्त्व समजते.