मुंबई : मुंबईत प्रदूषणाचा (Pollution) विळखा कायम असून, मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईतील काही भागात हवेचा स्तर अतिशय वाईट (Pollution) झाला होता. शिवडी, वरळी, बीकेसी, भायखळा या भागातील हवेची गुणवत्ता खालावली होती. याची दखल घेऊन गेल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगरातील महापालिकांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. विभाग कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी सध्या निवडणुकीच्या कामावर गेले असल्यामुळे या उपाययोजना सुरू करणे सहाय्यक आयुक्तांना अवघड झाले आहे.
मुंबईतील हवामानाचा स्तर (Pollution) गेल्या काही दिवसापासून बिघडत चाललेला असला तरी गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजना करण्यास अद्याप सुरूवात केलेली नाही. गेल्याच आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकांच्या प्रमुखांशी एक बैठक आयोजित केली होती व उपयायोजना करण्याबाबत सूचनाही केल्या होत्या. मात्र या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीच्या कामामुळे मनुष्यबळच नसल्याची मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील स्थिती आहे.
त्यामुळे प्रदूषण (Pollution) थांबवणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीनंतरचाच मुहूर्त मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांना प्रदूषित वातावरणाचा त्रास सोसावा लागणार आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून हिवाळ्याची चाहूल लागताच मुंबईतील हवेचा स्तर बिघडत आहे.