ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, वेदना, अपेक्षा!

वृद्धाच्या अगदी माफक अपेक्षा असतात. घरातल्यांनी वेळात वेळ काढून त्यांच्याशी बोलावे, एखाद्या ठिकाणी त्यांना जावेसे वाटले तर आवर्जून घेऊन जावे. समस्या तिथे मार्ग असतोच. फक्त तो स्वीकारण्याची मानसिकता हवी. आताची पिढी फार व्यस्त झाली आहे. त्यामुळे वृद्धाश्रम हा त्यावरील उत्तम उपाय ठरत आहे.


प्रासंगिक - मधुरा महंत


आधुनिक काळात वैद्यकीय प्रगतीमुळे औषध उपचाराच्या सहज व त्वरित उपलब्धतेमुळे माणसाचे आयुर्मान वाढत चालले आहे. चौकोनी कुटुंबातील मुले मोठी झाली, पंख फुटले आणि उडून गेली; खूप शिकली, परदेशात गेली. मुली सासरी गेल्या, त्याही परदेशात गेल्या. हे सगळे अभिमानाने सांगताना आई-वडिलांना आनंद होतो आणि होणारच; परंतु त्या दोघांपैकी एकजण गेलं (निधन झाले) तर येणारा एकाकीपणा भीषण असतो. कधीकधी दोघांना खूप एकटं वाटतं तर कधी चार माणसांत असूनही एकटेपण जाणवते आणि इथूनच समस्या सुरू होतात. मुलगा, सून, नातवंडे एकत्र असली तरी प्रत्येकजण आपल्याच विश्वात दंग असतो. ग्लोबलाझेशनच्या युगात व नवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे संवाद कमी झाला आहे. माणसाला अन्न, वत्र, निवारा या गरजेच्या गोष्टी असल्या तरी सहजीवनाची ही गरज आहे. दादा धर्माधिकारी यांनी सहजीवनाची व्याख्या केली आहे. त्याला विनोबा भावे, महात्मा गांधी यांनी सहमती दर्शवली होती. “सान्निध्य, संवाद व स्पर्श जन्मापासून मरणापर्यंत याची गरज असते.’’ लहान मुले खोलीत एकटी राहात नाहीत. त्यांना सान्निध्य हवे असते. स्पर्शाने मुले रडायचे थांबतात, त्यांच्याशी संवाद साधला तर ते हुंकार देतात. आवाजाकडे मान वळवतात. म्हणजे त्यांना संवाद हवा असतो. या तिन्ही गोष्टी मरेपर्यंत सजीवाला हव्या असतात. त्याच आता दुर्मीळ झाल्या आहेत.


पूर्वी एकत्र कुटुंबात, नंतर वाडा, चाळ, संस्कृतीत या समस्या नव्हत्या. आर्थिक समस्या, रोजगार गमावणे, उत्पनाची कमतरता, आर्थिक असुरक्षितता अशा अनेक समस्यांचा समावेश होतो. शारीरिक समस्या, आरोग्य वैद्यकीय समस्या, पोषणाची समस्या, घराची समस्या, मानसिक, सामाजिक व तसेच वृद्ध अत्याचाराची समस्या अशा अनेक समस्यांना ज्येष्ठांना सामोरे जावे लागते. निवृतीपर्यंत ठणठणीत असलेल्या व्यक्ती निवृतीनंतर आजारी पडलेले अनेकदा दिसतात. नोकरी करत असताना त्यांचे लक्ष फक्त कामात असते, पण रिकामेपणी ते शरीराकडे फार लक्ष देतात. मग एकेक आजार माना वर काढतात. नेहमीच या वेदना शरीराच्या असतात असे नाही. या वेदना मनाच्याही असू शकतात. स्वतःच्या खिशात पैसे नसतात, मुले दुर्लक्ष करतात. बरेच पालक भावनिक होऊन मुलांना घरासाठी, व्यवसायासाठी आपल्या नोकरीतून मिळालेली पुंजी देतात. काहींकडे साठवण्यासारखे काही नसतेच. पूर्णत: त्यांना मुलांपुढे हात पसरावे लागतात. त्याच्याही वेदना होतात. कधीतर “ताट द्यावे पण पाट देऊ नये’’ हे अगदी सत्य आहे. मुले घर बळकावतात व पालकांना घराबाहेर काढतात. अशी कितीतरी उदाहरणे आपण पाहिली आहेत. अपेक्षा आणि दुःख हातात हात घालून असतात.


वाचन हे माणसाला समृद्ध विचार करायला भाग पाडते. ज्येष्ठांनी फाजिल अपेक्षा मुलांकडून बाळगू नयेत. ज्येष्ठांची काळजी घेणे, त्यांचा आदर करणे. त्यांची शारीरिक, मानसिक काळजी घेणे, लहान मुलांसमोर त्यांच्यावर रागवू नये, त्यांना उलट बोलू नये. नकळत त्याचे परिणाम मुलांच्या संस्कारावर होत असतात. आपण जसे आपल्या पालकांशी वागू, तशीच आपली मुले आपल्याशी व आपल्या पालकांशी वागतील. वृद्धाच्या अगदी माफक अपेक्षा असतात. घरातल्यांनी वेळात वेळ काढून काही वेळ त्यांच्याशी बोलावे, त्यांचा हात हाती घ्यावा. हात डोक्यावरून फिरवावा, एखाद्या ठिकाणी त्यांना जावेसे वाटले तर आवर्जून त्यांना घेऊन जावे. काहींना कितीही पथ्य असली तरी कधीतरी आवडीचा पदार्थ जरूर खाऊ द्यावा. ते आर्थिकदृष्ट्या दुबळे असतील, तर गरजेपुरते पैसे त्यांना नक्की द्यावे. समस्या तिथे मार्ग असतोच.


फक्त तो स्वीकारण्याची मानसिकता हवी. आताची पिढी फार व्यस्त झाली आहे. वृद्धाश्रम हा त्यावरील उत्तम उपाय ठरत आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा. आजकाल मोठमोठी संकुल उभी राहात आहेत. जिम, तरंग तलाव असतात, तर तिथे एक वृद्धाश्रमाची मागणी करावी. मुलांनी कामावर जाताना घरातील वडीलधाऱ्यांना तेथे सोडावे आणि संध्याकाळी आपल्यासोबत घरी न्यावे. दिवसभर समवयीन लोकांबरोबर व सुरक्षित राहतील. ज्यांना शक्य आहे त्यांनी लिव इन रिलेशिपमध्ये राहावे. शोधले तर अनेक मार्ग सापडतात. शोधावे, स्वीकारावे, लोक काय म्हणतील हे वाक्य जगण्याच्या शब्दकोषातून नाहीसे केले, तर जगणे अधिक सुकर होते. सकारात्मक जीवन जगण्याला बळ देते, मग कोणत्याच समस्या जाणवत नाहीत. वेदना, अपेक्षा सारं काही दूर राहाते.
मरे एक त्याचा दूजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे।

Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,