Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीकोकणातील गणेशभक्तांचा सोयीस्कर, सुखकर प्रवास

कोकणातील गणेशभक्तांचा सोयीस्कर, सुखकर प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावरून ७ दिवसांत अंदाजे ७ लाख गाड्यांचा सुखकर प्रवास

देवा पेरवी

पेण : सहा दिवसांच्या गणपती व गौरी विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणातील चाकरमान्यांना मुंबईला घेऊन निघालेल्या एसटी बस, कार, रिक्षा, इको, मोटारसायकल, छोट्या-मोठ्या बसेस व विविध प्रकारच्या वाहनांची अत्यंत वेगवान वर्दळ दिसून आली आहे. परंतु रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतुकीच्या नियोजनपूर्ण व्यवस्थेमुळे यावर्षी तुरळक ठिकाणे सोडता कुठेही तासनतास अडकणाऱ्या ट्रॅफिकचा सामना भक्तांना करावा लागला नाही. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या या वाहनांची नोंद झाली असून ७ दिवसांत अंदाजे ७ लाख गाड्या सुसाट धावत सुखकर प्रवास झाला आहे. २४ तासाला सरासरी १ लाख वाहने मुंबई-गोवा महामार्गावरून आली-गेली आहेत. या दरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रायगडसह कोकणातील पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे.

महामार्गावरून गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलिसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेतली गेली होती. या नोंदीनुसार आजपर्यंत सात दिवसांत अंदाजे सातलाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. बाप्पाच्या विसर्जनानंतर शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून पुन्हा मुंबई, गुजरातच्या दिशेने येणाऱ्या या वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने परतीचा प्रवास करत आहेत. दिवस-रात्र सुरू असणारा सदरचा प्रवास पहाटेपर्यंत सुरूच होता. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून माणगावजवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव-कोलाड बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे.

यंदाचे वर्षी वाहतूक कोंडी होऊ नये व गणेशभक्तांना आपल्या गणरायाच्या दर्शनाला वेळेत पोहोचता यावे, तसेच गौरी-गणपती सण साजरा करून चाकरमानी पुन्हा मुंबई, ठाणे, पनवेल, गुजरातच्या दिशेने जाता यावेत यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्त्वाची खबरदारी घेतली आहे. गेल्या सात दिवसांत किमान ६ हजार ४०० एसटी बसेसमधून साधारण ५ लाखांहून अधिक चाकरमानी मुंबईहून कोकणात व कोकणातून पुन्हा ठाणे, मुंबईच्या दिशेने आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी जवळजवळ झाले असून त्यामुळे कोकणात जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा वेग वाढला आहे. पनवेलपासून पेण, कासू, इंदापूर, महाड, पोलादपूर रस्त्यावर गाड्या सुसाट धावत आहेत. त्यामुळे यंदा असंख्य कोकणवासीय व प्रवाशांनी निसर्गरम्य कोकणातून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे.

रायगड पोलिसांकडून सुरळीत वाहतुकीची नियोजनपूर्ण व्यवस्था

गुजरातसह मुंबई, ठाणे, पालघर या प्रमुख जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आपल्या कोकणातील गावी आले होते. त्यामुळे महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत, तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणाऱ्या अंदाजे ५० हुन अधिक अवजड वाहनांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -