Sunday, June 22, 2025

चिंताजनक! राज्यात वाढतायत चिकनगुनियाचे रुग्ण; डासांची शक्ती चारपट वाढली

चिंताजनक! राज्यात वाढतायत चिकनगुनियाचे रुग्ण; डासांची शक्ती चारपट वाढली

नागपूर : राज्यात चिकनगुनिया (Chikungunya) आणि डेंग्यूसारख्या (Dengue) डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे रुग्ण चिंताजनक पातळीवर वाढत आहेत. हवामान बदलामुळे डासांची शक्ती आणि प्रजननक्षमता चारपट वाढली आहे, असे चेन्नईच्या आरोग्य सल्लागार डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितले.


नागपूरमध्ये आयोजित कार्यशाळेत डॉ. श्रीधर यांनी स्पष्ट केले की हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, आणि अधिक पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे डासांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राज्यात सध्या डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ सुरू असून डासांमुळे हे आजार अधिक वेगाने पसरत आहेत.


हवामान बदलामुळे डासांची भौगोलिक व्याप्ती वाढली आहे, ज्यामुळे भारतासह जगभरात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रसार वाढला आहे. उदाहरणार्थ, एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे होणारा डेंग्यू २८.६ टक्के, तर एई अल्बोपिक्टस डासामुळे होणारा डेंग्यू २७.७ टक्क्यांनी वाढला आहे. जगभरात दरवर्षी डासांमुळे ७० कोटी लोकांना आजार होतात आणि दहा लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो.


डॉ. श्रीधर यांनी हेही सांगितले की जागतिक तापमानवाढीमुळे हृदय, किडनी, आणि यकृताचे आजार झपाट्याने वाढत आहेत, तसेच महिला व पुरुषांमध्ये व्यंध्यत्वाचा धोका वाढला आहे. या बदलांमुळे दरवर्षी ६.६७ दशलक्ष मृत्यू होतात.

Comments
Add Comment