मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे राजकारण करून त्याचा राजकीय फायदा कसा होईल, या प्रयत्नात असलेल्या उबाठाचे आदित्य ठाकरे व वैभव नाईक (Aditya Thackeray, Vaibhav Naik) यांच्यावर राजकोट किल्ल्यावर तब्बल दोन तास लपून बसण्याची नामुष्की ओढवली. अखेर दोन तासांनंतर पोलिसांच्या गराड्यातून आदित्य ठाकरे, वैभव नाईकना राजकोट किल्ल्यावरून पळावे लागले.
दरम्यान, पेंग्विन पेंग्विन घोषणानी त्यांना सुन्न करून सोडले. अखेर दोन तासांनी पोलिसांच्या सुरक्षा गराड्यात त्यांनी कशीबशी आपली सुटका केली. किल्ले राजकोट येथे आलेल्या आदित्य ठाकरे, वैभव नाईक व त्यांच्या गटाने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी उपस्थित भाजपा पदाधिकारी आक्रमक बनले. भाजपा नेते निलेश राणे व भाजपा पदाधिकारी यांचा आक्रमकपणा व रुद्रावतार पाहून आदित्य ठाकरे, वैभव नाईकांना लपून राहावे लागले. बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली. यावेळी काही ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी फटकारेही खाल्ले. अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला.
राणेंचा दरारा ठाकरे, नाईकांनी अनुभवला
वाद शांत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. तर मालवण दौऱ्यावर असलेले आमदार जयंत पाटील त्याठिकाणी पोहचले. चर्चा झाली, मात्र सुरु असलेल्या घोषणाबाजी पाहता वाद पुन्हा वाढण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र भाजपा पदाधिकारी, निलेश राणे यांनी संयम दाखवला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आदित्य ठाकरे, वैभव नाईक व अन्य पदाधिकारी ठिकाणाहुन पोलीस गराड्यात निघून गेले. यावेळी पेंग्विन पेंग्विन अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी कडे करून सर्वाना बाहेर आणले. एकूणच राणेंचा दरारा यावेळी आदित्य ठाकरे, वैभव नाईक यांनी अनुभवला.
जोरदार घोषणा
राणे साहेब अंगार है, बाकी सब भंगार है… राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है… हमारा नेता कैसा हो, राणे साहेब जैसा हो…. भारतीय जनता पार्टीचा, विजय असो…. यासह जोरदार घोषणाबाजी भाजपा पदाधिकारी यांनी केली.