मुंबई : शाहू समुहाचे नेते समरजित घाटगे यांनी अखेर भाजप पक्षाला रामराम केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री घाटगे यांची त्यांच्या नागाळा पाकमधील निवासस्थानी भेट घेत आणि त्यांच्याशी चर्चा करत मनधरणी केली होती. मात्र यावेळी मी फार पुढे गेलो आहे आता मागे फिरणे अशक्य आहे अशा स्पष्ट शब्दात समरजित घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
विधानसभेच्या मागील निवडणुकीत ‘कागल’ मध्ये तिरंगी लढत झाली होती. यावेळी समरजित घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने ‘कागल’ चे राजकारण वेगळ्या वळणावर आले.
समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये ‘कागल’ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशावर आज शिकामोर्तब झाला.