हिंडेनबर्ग अहवालात अदानी यांच्या समूहाचा संबंध असल्याच्या आरोपांनी पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. हिंडेनबर्ग यांच्या दाव्यानंतर त्यांच्या अहवालात गेल्या दोन वर्षांपूर्वीही असाच आरोप केला होता आणि त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते. सेबीच्या अध्यक्षा माधवी बूच यांनी हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्याचवेळी हे आरोप म्हणजे निराधार आणि चारित्र्यहिनाचा प्रयास असल्याचे म्हटले आहे. हे आरोप म्हणजे कोणत्याही सच्चाईपासून अलिप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तवात हिंडेनबर्गचा आरोप होता की, बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांचा अदानी मनी सायफनिंग घोटाळ्यात वापरला गेलेला पैशाचा म्हणजे ऑफशोअर हिस्सेदारीत सहभाग होता. बूच पती-पत्नींनी म्हटले आहे की, आमच्यावर केले गेलेले आरोप हे निराधार तर आहेतच, पण आमचे आतापर्यंतचे पुस्तक हे उघड्या पुस्तकासारखे आहे. आम्हाला कोणतीही वित्तीय कागदपत्रे दाखवण्यात कसलीही अडचण नाही. इतका सुस्पष्ट खुलासा केल्यानंतरही हिंडेनबर्ग यांच्या आरोपांचा आधार घेऊन भारतातील विरोधी पक्ष या विषयावर बवाल माजवत आहेत याचे कारण सुस्पष्ट आहे. ते म्हणजे हिंडेनबर्ग यांच्या आरोपांचा आधार घेऊन त्यांना पंतप्रधान मोदी आणि अदानी यांना लक्ष्य करायचे आहे.
गेल्या १०ऑगस्टला हिंडेनबर्ग यांच्याकडून आरोप केला गेला की, माधवी बूच यांनी अदानी सायफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या पैशात हिस्सेदारी होती. अदानी यांच्याशी संबंध असल्यामुळे सेबी या प्रकरणी काहीही कारवाई करण्यास तयार नव्हता. पण हे झाले आरोप-प्रत्यारोपांचे. पण भारताचे यात नुकसान झाले आहे ते अभूतपूर्व आहे. हिंडेनबर्ग कायम भारताविरोधात आणि विशेषतः मोदी सरकारविरोधात आरोप करण्यात पुढे असतो. कारण उघड आहे, ते म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकारला बदनाम करायचे आहे. त्यामुळे मोदी यांना बदनाम करून कशी तरी त्यांची प्रतिमा खराब करायची हा देशातील विरोधी पक्षांचा प्रबळ असा अजेंडा आहे. पण देशातील जनता सूज्ञ आहे आणि ती अशा गैरप्रकार करणाऱ्यांच्या धोक्यात येणार नाही, असा विश्वास आहे. आता हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलर कंपनीने आपल्या तोफा पुन्हा अदानी आणि त्याद्वारे मोदी यांच्याविरोधात डागण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्याचे लक्ष्य सेबीच्या अध्यक्षा माधवी बूच आहेत. बूच दांपत्यांवर केलेला आरोप हा भडकवणारा आणि दिशाभूल करणारा आहे.
गेल्या जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाने सेबी या प्रकरणाची व्यापक आणि सर्वसमावेशक चौकशी करत आहे आणि त्यांच्या चौकशीतून जे सत्य येईल ते योग्य असेल असा निर्वाळा दिला होता. पण तरीही आताही या प्रकरणी पुन्हा वेगळी जेपीसी नेमण्याची मागणी करणे हे विरोधकांच्या षडयंत्राचा वास येणारे आहे. त्याच वेळेस सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, विशेष चौकशी पथकाकडे या प्रकरणाची चौकशी देण्याची काहीच गरज नाही. तरीही भारतातील विरोधक या प्रकरणाचे भांडवल करून मोदी सरकारविरोधात मुद्दा उपस्थित करण्यासाठी त्याची ढाल म्हणून उपयोग करत आहेत. हे त्यांच्या क्षुद्रपणाचे निदर्शक आहे. हिंडेनबर्ग यांनी आरोप केला आहे की, बूच दांपत्यांनी आपल्याकडील कथित हिस्सेदारीच्या रकमेचा विनियोग करून, त्याचा उपयोग करून अदानी समूहात पैशाची हेराफेरी केली. पण या आरोप-प्रत्यारोपांमध्ये भारतातील विरोधी पक्षांची गोची झाली आहे. कारण त्यांना हे नक्की काय प्रकरण आहे तेच समजत नाही. त्यामुळे त्यांना नेहमीप्रमाणे मोदी यांना शिव्या घालायच्या पण त्या कशामुळे हे समजत नाही. बूच दांपत्यांचा आरोप खरा आहे की, सेबीच्या विश्वासार्हतेवरच हिंडेनबर्ग आरोप करत आहे. त्याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा, पण विरोधी मात्र मोदी यांच्या द्वेषाने पछाडले आहेत, त्यामुळे ते एक होऊ शकत नाहीत. खरी गोष्ट अशी आहे की, जितके मोठे उद्योग समूह तितके त्यातील घोटाळे मोठे असे चित्र देशात तयार झाले आहे. हिंडेनबर्ग त्याला अपवाद नाही. एकीकडे सचोटीने उद्योग करून देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारे काही उद्योग समूह देशात असताना अल्पावधीत पुढे जाण्यासाठी काहीही मार्ग वापरणारे उद्योग समूह आहेत. त्यापैकीच एक आहे हिंडेनबर्ग.
हिंडेनबर्गने यावेळी थेट सेबीमध्ये व्हिसलब्लोअर असलेल्या सेबीवर हल्ला बोल केला आहे. हे निश्चितच भारतासाठी वाईट आणि खेदजनक आहे. माधवी बूच यांनी अदानी समूहावर कारवाई केली नाही कारण त्यांचे त्यात हितसंबंध दडले आहेत, असा आरोप हिंडेनबर्ग यांचा आहे. बूच यांनी तो फेटाळला आहे हे खरे आहे. मागेही अदानी समूहावर हिंडेनबर्गने आरोप केले तेव्हा त्या उद्योगाचे शेअर्स कोसळले होते आणि त्यांचा एक व्यवहार झाला नव्हता. पण आताही तसेच करायचे हिंडेनबर्गच्या मनात होते. पण तसे काही यंदा होणार नाही. या प्रकरणाची चौकशी झाली मात्र पुढे काहीच निष्पन्न झाले नाही. तेव्हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठे उद्योग समूह असा गैरप्रकार करतात हे समोर आले होते. तेव्हा काहीच झाले नाही म्हणून हा दुसरा धक्का देण्यात आला असावा असे मानण्यास जागा आहे. कारण यंदा विरोधी पक्षांची स्थिती पूर्वीपेक्षा जास्त प्रबळ आहे आणि काँग्रेस आता जवळपास शंभर लोकसभेच्या जागा घेऊन आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष हे ताकदवान झाल्याचे समजत आहेत. पण त्यांनी कितीही ताकदवान झाल्याच्या गमजा केल्या तरीही विरोधी पक्षांना हिंडेनबर्गचा भस्मासूर गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. यात खरे म्हणजे पहिल्या वेळेसच परिस्थिती सरकारने समोर आणून खरे काय ते लोकांसमोर ठेवले असते, तर हे सारेच प्रकरण पुढे टाळता आले असते.