हलकं-फुलकं – राजश्री वटे
एकाच नाण्याच्या या दोन बाजू…
असंच असतं ना माणसाचं जीवन…
कधी चित … कधी पट!
कभी हार, कभी जीत!!
मानवी जीवनातला ऊन पावसाचा खेळ…
म्हणजे यश आणि अपयश…
काही व्यक्तींच्या आयुष्यात फक्त यशच यश…
यशाचं पारडं कायम भारी!
लहानपणापासून कौतुकाला पात्र एखाद् मूल…
सतत कौतुकात नहात असतं… शाळेपासून अव्वल, कॉलेजमध्ये टॉपर, नोकरीमध्ये उत्तम… सगळ्या सुखसोयींनी युक्त असं आयुष्य…
यश… यश… आणि फक्त यश!!
हळूहळू या यशाची इतकी सवय होऊन जाते की, जरा कमी-जास्त झालं की ते सहन करण्याची ताकद त्यात नसते… यशासाठी अपार मेहनत घेतली असतेच. पण अपयश सहन करण्याची ताकद संपलेली असते…
असं हे खणखणीत नाणं…
पट एके पट!!
या नाण्याला फार जपलं जातं, जे हवं ते मिळतं… सगळं मनासारखं घडत असतं… हळूहळू त्याचा इगो जोपासला जातो… हार मानायचीच नसते… अर्थात जिंकण्याचं स्वप्न बघणं चांगलंच पण हावी व्हायला नको, याचं भान ठेवलं पाहिजे… नाहीतर यश डोक्यात जायला वेळ लागत नाही नाही अन् मग थोड्याशाही मनाविरुद्ध अपयशाने निराशेच्या खोल गर्तेत जाऊन गटांगळ्या खाव्या लागतात… कधी कधी एखादी हार ही पाय जमिनीवर ठेवायला भाग पाडते!!