पुणे : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) संपूर्ण राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र अनेक ठिकाणी या पावसाचा जोरदार फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच पुण्यातील ताम्हिणी घाटालाही (Tamhini Ghat) या पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड-पुणे (Raigad- Pune) जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटावरील रस्ता एका बाजूने खचला आहे. यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मार्ग पुढील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचला आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यातच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवसात याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमते. त्यामुळे सध्या या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदीचे निर्देश जारी केले आहेत.
दरम्यान, रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून उपाययोजनाही करण्यात येत आहेत.
वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद
पुणे येथून कोकणाकडे जाण्यासाठी वरंधा घाट आणि ताम्हिणी घाट असे दोन मार्ग आहेत. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यातच वरंधा घाटात अनेक अरुंद रस्ते व वळणे असल्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.