सरपंचासह सहा जणांना अटक; नेमकं काय घडलं?
अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पांगरमल (Pangarmal) येथे शेळ्या चोरल्याच्या संशयावरून जमावाने एका महिलेसह तिघांना मारहाण केली. यात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली असून चांगदेव चव्हाण (Changdev Chavan) असे मयत तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड (Amol Awhad) तसेच सहा जणांसह इतर अनोळखी २० ते २५ जणांविरूध्द खून , विनयभंग, अॅट्रोसिटी या कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मयत चांगदेव चव्हाण हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून मागील नऊ महिन्यांपासून पांगरमलमध्ये राहत होता. फिर्यादीनुसार काल मध्यरात्री एक जमाव चव्हाण यांच्या घरी आला आणि गावात शेळ्या चोरी जात आहेत, असं म्हणत जमावाने चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीत चांगदेव चव्हाण याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने करावाई करत सरपंचासह सहा जणांना अटक केली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.