Thursday, September 18, 2025

सेंगोल हे देशाचे प्रतिक, ते हटवणार नाही; विरोधकांच्या आरोपांना भाजपाचे चोख प्रत्युत्तर

सेंगोल हे देशाचे प्रतिक, ते हटवणार नाही; विरोधकांच्या आरोपांना भाजपाचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : सेंगोल हे देशाचे प्रतिक आहे. सेंगोल स्थापन करण्यात आले, ते आता कुणीही हटवू शकत नसल्याचे प्रतिपादन भाजपाचे खासदार महेश जेठमलानी यांनी केले आहे.

नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधीनंतर आणि सभापती निवडीनंतर गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यानंतर, संसदेत स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलवरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी संसद भवनातील सभापतींच्या आसनाजवळ लावण्यात आलेला सेंगोल हटवण्याची मागणी केली आहे. सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.

समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आरके चौधरी म्हणाले, आपल्या गेल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने संसदेत 'सेंगोल' स्थापन केले आहे. ‘सेंगोल’ म्हणजे ‘राजदंड’, याचा अर्थ ‘राजाचा दंड’ असाही होतो. राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश 'राजाच्या दंडा'ने चालणार की संविधानाने? संविधान वाचवण्यासाठी संसदेतून सेंगोल हटविले जावे.

आरके चौधरी यांच्या विधानावर बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख तथा खासदार अखिलेश यादव म्हणाले, जेव्हा सेंगोल स्थापन करण्यात आला तेव्हा पंतप्रधान त्याच्यासमोर नतमस्तक झाले होते.

या मुद्यावर काँग्रेस आणि आरजेडीनेही समाजवादी पक्षाचे समर्थन केले आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी, आरजेडी नेत्या मीसा भारती यांनीही सेंगोल हटवण्याची मागणी केली.

आर के चौधरी यांच्या वक्तव्यावर भाजपचे लोकसभा खासदार खगेन मुर्मू म्हणालेकी, विरोधी पक्षाच्या लोकांना दुसरे काही काम नाही. यांनी संविधानाच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज पसरवला. हे लोक संविधानाला मानत नाहीत. उलट मोदीजी संविधानाला अधिक सन्मान देतात. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी म्हणाले की, ही लोक अशीच सर्व कामे करतात. हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. हे लोक प्रसिद्धीसाठी असे बोलतात. आपण सर्वच जण संविधानाला मानतो. एकट्या समाजवादी पक्षाने संविधानाचा ठेका घेतलेला नाही.

Comments
Add Comment