सर्वस्वी राहावे रामास अर्पण ।

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


आता ऐका माझे वचन । मनाने व्हावे रामार्पण ॥ माझे नातेगोते एक राम । हा भाव ठेवून जावे रामास शरण ॥ अनन्य व्हावे भगवंती । जो कृपेची साक्षात मूर्ति ॥ रामा आता करणे नाही उरले जाण । तुला आलो मी अनन्य शरण ॥ सुखदु:खाचा दाता । सत्य नाही दुजा आता ॥ जाणिवेने जैसे घ्यावे । तैसे मनाने सुखदु:ख भोगावे ॥ मी-माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण । तोपर्यंत नाही समाधान ॥ सर्वस्वी राहावे रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥ रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती । त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥ प्रयत्नेविण राहो नये । फळाची आशा ठेवू नये । भगवंताला विसरू नये । कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे ॥ प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान । तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम ॥ अखंड राखावे अनुसंधान । येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥


वृत्ती राखावी अत्यंत शांत । हेच संताचे मुख्य लक्षण जाण ॥ जे जे घडेल काही । ते ते रामइच्छेने पाही॥ असा करावा संसार । परि असावे खबरदार । त्राता राम जाणुनी चित्ती । निर्भय करावी आपली वृत्ती। थोर भाग्य उदया आले । रामराय घरी आले । आता व्हावे रामाचे आपण। व्यवहार, प्रपंच करावा जतन ॥ न दुज्याचा दोष पाहावा । त्याचा आपणापाशीच ठेवा ॥ देह आहे परतंत्र । मन राखावे भगवंताशी स्वतंत्र ॥ मनाने जो बांधला । परतंत्र वाटेल त्याला ॥ शरण गेला रामचरणी । त्याला नाही दुजी हानी ॥ अखंड करावे नामस्मरण । नीतिधर्माचे असावे आचरण ॥ बायको-मुले, लहान थोर । यांनी न सोडावा रघुवीर ॥ काळ फार कठीण आला । बुद्धिभेद त्वरित झाला ॥ आता सांभाळावे सर्वांनी आपण । रामाविण न जाऊ द्यावा क्षण । चालले तसेच चालावे। राम ठेवील तसे असावे ॥ माझा राम जोडला हे जाणले ज्याने । त्याला न उरले करणे॥ राम ठेवील ज्या स्थितीत । त्यात समाधान मानावे ॥ रामास जे करणे असेल । ते तो करील ॥ सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥ त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥ जो करी रामपदांबुजचिंतन । तयास नाही यमाचे बंधन ॥ संताची सेवा केली । महद्भाग्य घरी आले॥ एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण ॥ तोच खरा धन्य धन्य ॥ संताचे मर्जीने वागल्यास। कल्याण होईल खास ॥


तात्पर्य - अखंड राखावे अनुसंधान । येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥

Comments
Add Comment

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा

संत कबीर

पंडित होय के आसन मारे पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है। अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।। - डॉ.

महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि

तृतीयपंथियांचा आक्रोश

ऋतुराज ऋतुजा राजेश केळकर अचानक एक बाळाचा आक्रोश हवेत पसरला आणि सगळे थरारले. तिसऱ्या मजल्यावरील बंद घरातून तो

आत्मबोधाचा शाश्वत आनंद

अर्चना सरोदे मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा हा जीव