केकेआरने सोपा विजय धोनीसेनेला केला बहाल

आयपीएल डायरी - उमेश कुलकर्णी


कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या टाटा आयपीएलमधील शक्तीशाली संघ म्हणून ओळखला जात होता. पण चेन्नई सुपरकिंग्सने त्याच्या विजयरथाचे चाकच पंक्चर केले आणि काल शाहरूखच्या या संघाला धोनीच्या सेनेने नमवले. तेही अगदी दणदणीत पद्धतीने. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम केकेआरला फलंदाजीला आमंत्रण दिले. त्यानंतर केकेआरसाठी सामना म्हणजे दुःस्वप्नच ठरला. केकेआरचा संघ हा दबावाखाली ढेपाळतो आणि कोसळतो, याचे प्रत्यंतर धोनी सेनेने आणून दिले. वास्तविक केसकेआरवर दबाव काहीच नव्हता. त्यांचा विजय रथ सुरू होता. पण सीएसकेसमोर खेळण्याच्या दबावाखाली आला आणि त्यानंतर केकेआरला पराभव पाहावा लागला.


सीएसकेसाठी साऱ्याच गोष्टी अनुकूल ठरल्या आणि नाणेफेकीपासून ते अंतापर्यंत सामना त्यांच्याच प्रभुत्वाखाली होता. सीएसकेने केकेआरला केवळ १३७ धावांत गुंडाळले आणि केकेआरचे धुवांधार फलंदाज सुनील नरेन आणि रिंकू सिंग हे दोन्हीही फलंदाज उत्तम फिरकी गोलंदाजी असली तर काहीही करू शकत नाहीत, हे सिद्ध झाले. केकेआरचे चौकार आणि षटकारांची बरसात करणारे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर पुढील खेळ हा सीएसकेसाठी डाव्या हातचा मळ होता. केकेआरकडून कुणीच मैदानावर उभे राहिले नाही आणि त्यांनी विकेट्स फेकल्या. केकेआरचा संघ सुनील नरेन याच्यावर किती अवलंबून आहे, तेही दिसले. त्यामुळे सुनील नरेन जडेजाच्या गोलंदाजीवर तीक्ष्णाच्या हाती झेल देऊन बाद झाला तेव्हाच केकेआरच्या दृष्टीने सामना संपला होता. कारण कोणतीही गोलंदाजी उद्ध्वस्त करण्याची ताकद त्याच्या फलंदाजीत आहे. पण सुनील नरेन बाद झाला आणि केकेआरची प्रतिकार क्षमता जवळपास संपलीच.


श्रेयस अय्यरनेच ३४ धावा काढून थोडा प्रतिकार केला. पण त्याला एकही षटकार मारता आला नाही. सुनील नरेननेच दोन षटकार मारले. तर रिंकू सिंगने केवळ ९ धावा केल्या. बाकीच्या केकेआरच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. आंद्रे रसेलही फार काही करू शकला नाही. केकेआरकडून सीएसकेला प्रतिकार असा झालाच नाही. सीएसके तणावात होता असे कधीही वाटले नाही. गौतम गंभीर हा केकेआरचा मेंटरही कालच्या त्याच्या संघाच्या प्रदर्शनाने निराश झाला असेल. पण कौतुक करावे लागेल ते रवींद्र जडेजाचे. धोनी जडेजाला जडेजा सर म्हणतो आणि जडेजा त्याला पात्र का आहे ते त्याने काल दाखवले. त्याने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सुनील नरेनची विकेट काढून दिली.


याशिवाय त्याने अंगकृष रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर या महत्त्वपूर्ण विकेट्स काढल्या. शिवाय त्याने दोन महत्त्वपूर्ण झेलही घेतले. त्यामुळे रवींद्र जडेजा विरूद्ध केकेआर असाच हा सामना झाला की काय असे वाटत होते. त्यात जडेजाने बाजी मारली. चेन्नईच्या तुषार देशपांडेचे कौतुक करावे लागेल. कारण त्याने फलंदाजांसाठीच असलेल्या या खेळात काल तीन विकेट काढून केकेआरचे कंबरडे मोडण्यात जडेजाच्या बरोबरीने आपला वाटा उचलला. अष्टपैलू खेळ करणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवले जावे, हेच उचित होते. सीएसकेची फलंदाजीची सुरूवातही डळमळीतच झाली. पण सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड रॉक ऑफ जिब्राल्टरसारखा उभा राहिला आणि त्याने नाबाद ६७ धावांची एक शानदार खेळी केली. त्यात त्याने ९ चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावरच चेन्नईचा संघ हा सामना जिंकून केकेआरला पाणी पाजू शकला.


सीएसकेचा सिक्सर किंग शिवम दुबे याने आपल्या मोठेपणाच्या खाणाखुणा या लहानशा खेळीतही दाखवून देताना तीन षटकार खेचले. १३८ धावा करण्याचे आव्हान हे मुळी आव्हानच नव्हते. ते चेन्नईने सहज पार केले आणि सात विकेट राखून तो संघ विजयी झाला. जडेजाने १८ धावांत तीन, तर देशपांडेने ३३ धावांत तीन विकेट काढल्या आणि केकेआरच्या संघातील उरली सुरली हवा काढून घेतली.


केकेआरचा संघ हा सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांच्यावर किती अवलंबून आहे ते काल दिसले. हो दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर इतर केवळ मैदानावर येऊन गेले. केकेआरतर्फे कुणीही एक फलंदाज उभा राहिला असता तर केकेआर जिंकू शकला असता. कुणीच तसा प्रयत्न केला नाही. घरच्या मैदानावर म्हणजे चेपॉक स्टेडियमवर धोनीची सेना अभेद्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. चेन्नईच्या संघाने केळ्याची साल सोलल्यासारखा हा सामना जिंकला. जराही कष्ट त्यांना पडले नाहीत. पॉवरप्लेमध्ये केकेआरने धमाकेदार सुरूवात केली होती. एक बाद ५६ अशी त्यांची धावसंख्या सहा षटकांनंतर होती. पण ती गती त्यांना ठेवता आली नाही आणि बहुदा ती ठेवण्याचा दबाव आल्यामुळे त्यांचे फलंदाज बाद झाले आणि केकेआरला एक मामुली आव्हान देता आले.


अशा आव्हानावर जिंकण्याची कल्पना करणे अशक्य आहे. त्यासाठी संघात बेदी चंद्रा किंवा प्रसन्नसारखे फिरकी गोलंदाज असले पाहिजेत. पण आता तसे फिरकी गोलंदाज भारताकडे नाहीत. त्यामुळे अखेर केकेआरने जराही उत्कंठा न निर्माण न करता हा सामना गमावला. केकेआरने लढतही दिली नाही आणि चेन्नईला अगदी सोपा विजय बहाल केला.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या

WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या

FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व

MI VS KKR : मुंबई विरुद्ध केकेआर मध्ये हायव्होल्टेज लढत; प्लेऑफसाठी KKR ला विजय आवश्यक; हार्दिक पांड्याचे पुनरागमन ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज 65 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना Eden Gardens