
पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
मुंबई : मनसे नेते (MNS leader) वसंत मोरे (Vasant More) अनेक कारणांवरुन चर्चेत असतात. ते मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र, मागील काही दिवसांतील त्यांच्या हालचालीवरुन ते पक्षांतर्गत गोष्टींवरुन नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media Account) केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी पाठबळ मिळालं आहे. या नाराजीतूनच वसंत मोरे वेगळा राजकीय निर्णय घेतात की काय, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात म्हटले आहे की, 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो... त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो...'. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांचा नेमका रोख कोणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. काही वेळा जाहीरपणे, काहीवेळा अंतर्गत तर कित्येकदा सोशल मीडियातून त्यांची नाराजी उघड झालेली आहे. एवढं सगळं होऊनही त्यांनी राज ठाकरे यांची साथ कधी सोडलेली नाही. मात्र, आता लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) दोन-तीन दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे मनसे पक्षातली अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. आपल्याला कुणाकडूनही अपेक्षा नाहीत, असं म्हणत वसंत मोरे यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे ते भविष्यात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.