कायदेशीर जगतातील ‘भीष्म पितामह’

Share

देशातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस. नरिमन यांचे बुधवारी नवी दिल्लीत निधन झाले. फली नरिमन यांनी ७० पेक्षा जास्त वर्षे वकिली केली. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतातील कायदेशीर जगतातील ‘भीष्म पितामह’ आपल्यातून निघून गेल्याची भावना वकील वर्गात व्यक्त केली जात आहे. फली एस. नरिमन यांनी नोव्हेंबर १९५० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली होती आणि त्यानंतर १९७१ पासून सर्वोच्च न्यायालयात अनेक मोठ्या प्रकरणात ते वकील म्हणून उभे राहिलेले दिसले. भारताची राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेवर असलेली त्यांची पकड पाहता, १९७५ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते; परंतु त्याच वर्षी जूनमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सरकारने आणीबाणी घोषित केल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात त्यांचे शैक्षणिक कौशल्य कायम राहिले, जिथे त्यांनी १९५० मध्ये बार परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आणि एक विशिष्ट कायदेशीर कारकीर्द सुरू केली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील झाल्यापासून अनेक दशकांच्या कारकिर्दीत नरिमन यांचे भारतीय कायद्यातील योगदान अतुलनीय राहिले आहे. १९९१ ते २०१० पर्यंत भारतीय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष गाजला. तसेच जागतिक लवाद म्हणून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र रोहिंटन नरिमन यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे.

फली नरिमन यांनी व्यावसायिक जीवनात अनेक प्रतिष्ठित पदे उपभोगली. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नरिमन यांच्या भूमिकांमध्ये १९७१ पासून सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे अध्यक्ष आणि इतर अनेकांचा समावेश आहे. नरिमन यांना जानेवारी १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषणने गौरविण्यात आले. नरिमन यांच्या जीवनाची आणि कार्याची ओळख अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून झाली आहे. यामध्ये प्रतिष्ठित पद्मभूषण, रोमन कायदा आणि न्यायशास्त्रासाठी किनलॉच फोर्ब्स सुवर्णपदक आणि न्यायासाठी ग्रुबर पुरस्कार यांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडून १९वा ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त केल्याने एक कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांचा गौरव झाला होता. कायदेतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या नरिमन यांनी लेखन क्षेत्रातही ठसा उमटवला. ‘द स्टेट ऑफ नेशन’, ‘गॉड सेव द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट’ ही पुस्तके त्यांच्या नावावर प्रकाशित आहेत. याशिवाय, ‘बिफोर मेमरी फेड्स’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. त्यांचा प्रभाव आंतरराष्ट्रीय न्यायिक आयोग आणि लंडन कोर्ट ऑफ इंटरनॅशनल आर्बिट्रेशन व इतर महत्त्वाच्या कायदेशीर संस्थांपर्यंत वाढला होता.

नरिमन हे महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेण्यासाठी ओळखले जात होते. आपल्या ७ दशकांच्या सेवेत त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळविले. भोपाळमधील युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यांसारख्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये नरिमन यांनी मांडलेल्या कायदेशीर बाजूंमुळे त्यांच्या कामाचे कौशल्य काळाच्या ओघातही नव्या पिढीच्या वकिलांना आदर्श वाटणारे आहे. जिथे त्यांनी पीडितांना मदत करण्यासाठी जटिल उलटतपासणी घेतली होती. टीएमए पाई केस, जयललिता बेहिशोबी मालमत्ता प्रकरण, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग प्रकरणात त्यांनी मांडलेली बाजू लक्षात राहणारी आहे.

‘बिफोर मेमरी फेड्स’ या त्यांच्या आत्मचरित्रात व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक खेदाचे अनेक प्रसंग अधोरेखित करीत, ते संवेदनशील मनाचे व्यक्तिमत्त्व होते, याची ओळख होते. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी वकील म्हणून केलेल्या त्यांच्या कामातील नैतिक गुंतागुंतही विशद केली आहे. नरिमन यांनी भारतीय न्यायव्यवस्थेला आकार देणारी अनेक ऐतिहासिक प्रकरणे सोडविली. ‘मानवांच्या चुकीवर घोडे व्यापार’ हे वाक्य वापरणे म्हणजे घोड्यांचा अपमान असल्याचे नरिमन यांचे म्हणणे होते. घोडा हा अत्यंत निष्ठावान प्राणी आहे. नरिमन हे इतिहासातील गहिरे रहस्ये शोधून काढत असत आणि बोलताना ते आपल्या बुद्धीने उत्तम प्रकारे त्यांची मांडणी करीत असत. त्यांनी इंटरनॅशनल कौन्सिल फॉर कमर्शियल आर्बिट्रेशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. १९९५ ते १९९७ पर्यंत इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्ट आणि जीनिव्हाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षपद भूषवले.

नरिमन यांचा प्रवास जसजसा पुढे जात राहिला तसतसे त्यांचे जीवन कायदेशीर व्यवसायातील भावी पिढ्यांसाठी उत्कृष्टतेचे आणि सचोटीचे प्रतीक राहिले. त्यांचा वारसा त्यांचा मुलगा रोहिंटन नरिमन याने पुढे नेला, ज्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले. कायदेशीर दिग्गजांपैकी एक मानले जाणारे फली नरिमन आता या जगात राहिले नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

41 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

57 minutes ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago