
नवी दिल्ली: भारताला मोठा विजय मिळाला आहे. कतारने भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताच्या विनंतीवरून त्यांच्या शिक्षेत कतारच्या अमीरकडून आधीच कपात करण्यात आली होती. आता परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की त्यांची सुटका करण्यात आली आहे. यातील ७ नौदल अधिकारी मायदेशी परतले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, भारत सरकार कतारमध्ये ताब्यात घेण्यात आलेले दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम कऱणाऱ्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेचे स्वागत करत आहेत. त्या ८ अधिकाऱ्यांपैकी ७ जण मायदेशात परतले आहेत. आम्ही नागरिकांची सुटका आणि घरवापसी सक्षम करण्यासाठी कतरा राज्याच्या अमीरच्या निर्णयाचे कौतुक करतो.
दिल्ली पोहोचताच 'भारत माता की जय'चे नारे
भारतात परतलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांपैकी एकाने सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांची सुटका शक्य नव्हती. दिल्ली एअरपोर्टवर लँड केल्यानंतर त्यांनी भारत माता की जय असे नारे लगावले. सर्व माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी आणि कतारच्या अमीरचे आभार मानले.
काय आहे प्रकरण?
कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, कतारने आरोपांबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिलेली नव्हती.