
- ऐकलंत का! : दीपक परब
लवकरच येतेय भेटीला ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’
महाराष्ट्राच्या गौरवशाली शिव इतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा भव्य सिनेमा २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात एका भव्य सोहळ्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. यावेळी सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, तसेच चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर व दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते. या मंगलसमयी कलाकारांच्या हस्ते धार्मिक विधीने श्रीराम पूजा आणि हवनही करण्यात आले.
चित्रपटाचे पोस्टर अनावरण हे केवळ चित्रपटाचीच ओळख करून देणार नाही, तर या महत्त्वाच्या दिवसाचे अध्यात्मिक महत्त्वही आत्मसात करणार आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला मानवंदना आहे. हा गौरवशाली इतिहास सर्वांसाठी लवकरच चित्रपट रूपात येत आहे. गोल्डन रेशियो फिल्म्स, किंग्जमेन प्रॉडक्शन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजन यांच्या सहयोगाने डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे आहेत.
अक्षय बर्दापूरकर, दीपा त्रासी निर्मित या चित्रपटाचे क्रिएटिव्ह वाईब, सौम्या मोहंती विळेकर, समीर अरोरा सहनिर्माते आहेत.
मयूरी देशमुख, सिद्धार्थ जाधव यांचा ‘लग्नकल्लोळ’
काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयूरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून, वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयूरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे. मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयूर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत, तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की.