पोलीस म्हणतात, या कार्यक्रमाला परवानगी नव्हती...
नवी दिल्ली : दिल्लीच्या कालकाजी मंदिरात (Kalkaji Mandir) जागरण सुरू असतानाच अचानक स्टेज कोसळला. यामुळे पळापळी झाल्याने चेंगराचेंगरीत (Stampede) सुमारे १७ जण जखमी झाले आणि एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात माता का जागरणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रात्री साडेबाराच्या सुमारास १५०० ते १६००० लोकांची गर्दी जमली होती. या गर्दीचे मुख्य कारण म्हणजे जागरणमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड गायक बी प्राक (B Praak) पोहोचला होता, त्याला पाहण्यासाठी सगळे जमले होते. या दरम्यान, जमाव आयोजक व्हीआयपींच्या कुटुंबीयांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढला आणि स्टेज खाली कोसळला आणि मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली.
या अपघातात स्टेजखाली बसलेले १७ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, जखमी झालेल्या ४५ वर्षीय महिलेला ऑटोमधून मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.
कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी नव्हती : पोलीस
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७/३०४ अ/१८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.