पुढील २४ तास राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता
मुंबई : देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी (Cold) पसरली आहे. मुंबईला (Mumbai) देखील यंदा थंडीचा तडाखा बसला आहे. मात्र, काही राज्यांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) पुन्हा एकदा नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. कोकणात देखील अवकाळी पावसाने ऐन फुलोऱ्यावर आलेल्या आंबा, काजूच्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. खराब हवामानामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली. यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळीच्या हजेरीमुळे बळीराजाच्या समस्या संपत नसल्याचे चित्र आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात काल अवकाळी पाऊस पडला. सिंधुदुर्गात आजही सर्वत्र पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे अवकाळीमुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढली आहे.
स्ट्रॉबेरीच्या पिकावर रोग पडण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर भागांत रिमझिम पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील काही गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. सकाळी महाबळेश्वर परिसरात एक तास तुरळक पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. स्ट्रॉबेरीवर काळे डाग आणि रोग पडण्याची दाट शक्यता असल्याने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.
पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपले
सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा दिसून येत आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढलं. दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता
पुढील २४ तास कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.