श्रीरामांचा वनवास संपला, श्रीकृष्णाची सुटका कधी होणार?

गझनवीपासून औरंगजेबापर्यंत तीन वेळा पाडलेल्या मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादावर तोडगा कधी निघणार?


मुंबई : अयोध्येमधील श्री राम जन्मभूमीच्या (Ayodhya Ram Temple) मुद्द्यावर तोडगा निघाल्यानंतर आता मथुरेतील (Mathura) श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद (Shri Krishna Janmabhoomi Dispute) चर्चेत आला आहे. हे संपूर्ण प्रकरण श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह संकुलाच्या सुमारे साडेतेरा एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित आहे.


यामध्ये १६०० वर्षांचा इतिहास असलेल्या श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर सुमारे ११ एकर जागेवर तर शाही ईदगाह मशीद २.३७ एकर जागेवर बांधण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाचा दावा आहे की ज्या भूमीवर मशिद बांधली आहे त्या जागेवर कंस राजाचा तुरुंग होता. त्याच ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे मंदिर ट्रस्टने संपूर्ण जमिनीवर दावा केला आहे, तर ईदगाह प्रशासनाचे म्हणणे आहे की ही जमीन १९६८ मध्ये झालेल्या करारानुसार मशिदीसाठी देण्यात आली होती.

श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ व्यवस्थापनाकडून शाही ईदगाह समितीचा १९६८ चा करार अमान्य करण्यात आला आहे. हे मंदिर इतिहासात अनेक वेळा नष्ट झाले आहे आणि पुन्हा बांधले गेले आहे. मुस्लिम राजवटीत तब्बल तीन वेळा हे मंदिर तोडण्यात आले. मुघल सम्राट औरंगजेबाने आपल्या राजवटीत अनेक मंदिरे पाडली होती, त्यात श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराचाही समावेश आहे, असा त्यांचा दावा आहे.


मथुरेतील मल्लपुरा भागातील कटरा केशवदेव या ठिकाणी पाच हजार वर्षांपूर्वी राजा कंसाचा तुरुंग होता. याच तुरुंगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. मथुरेतील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेल्या मंदिराचा इतिहास रंजक आहे. हे मंदिर तीन वेळा नष्ट झाले आणि चार वेळा पुन्हा बांधले गेले. इतिहासकारांच्या मते, सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्यने बांधलेले हे भव्य मंदिर बांधले होते. त्यानंतर १०१७ मध्ये महमूद गझनवीने आक्रमण करून ते लुटून नष्ट केले होते. या ठिकाणी सापलडेल्या ब्राह्मी लिपितील शिलालेखात असं म्हटलं आहे की, श्रीकृष्णाचा पणतू बृजनाभ याने हे मंदिर बांधले होते.


मथुरेतील श्रीकृष्णाचे दुसरे मंदिर सम्राट विक्रमादित्यच्या काळात, ई.स. ४०० मध्ये बांधले गेले असे इतिहासकार मानतात. हे भव्य मंदिर होते. त्यावेळी मथुरा हे संस्कृती आणि कलेचे प्रमुख केंद्र म्हणून स्थापित झाले होते. या काळात येथे हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचाही विकास झाला. त्यानंतर १०१७ मध्ये महमूद गझनवीने आक्रमण करून ते लुटून नष्ट केले होते.


या ठिकाणच्या उत्खननात सापडलेल्या संस्कृत शिलालेखावरून ११५० मध्ये राजा विजयपाल देव याच्या कारकिर्दीत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी नवीन मंदिर बांधल्याचे दिसून येते. हे मंदिर १६ व्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोदीच्या कारकिर्दीत नष्ट झाले.


यानंतर सुमारे १२५ वर्षांनंतर जहांगीरच्या काळात ओरछा येथील राजा वीरसिंह देव बुंदेला याने याच ठिकाणी चौथ्यांदा मंदिर बांधले. औरंगजेबाने १६६९ साली ते पाडून त्याच्या एका भागावर ईदगाह बांधल्याचे सांगितले जाते. येथे सापडलेल्या अवशेषांवरून या मंदिराभोवती उंच तटबंदी असल्याचे दिसून येते.


ब्रिटीश राजवटीत बनारसचे राजा पटनिमल यांनी १८१५ साली लिलावात ही जागा विकत घेतली होती. १९४३ साली उद्योगपती जुगल किशोर बिर्ला मथुरेत आले आणि त्यांना श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाची दुर्दशा पाहून खूप वाईट वाटले. त्यानंतर बिर्ला यांनी ७ फेब्रुवारी १९४४ रोजी राजा पटनिमल यांच्या तत्कालीन वारसांकडून कटरा केशवदेव हे ठिकाण विकत घेतलं. बिर्ला यांनी २१ फेब्रुवारी १९५१ रोजी श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली आणि त्या माध्यमातून मंदिराच्या निर्मितीला सुरूवात झाली.


श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या स्थापनेपूर्वी येथे राहणाऱ्या काही मुस्लिमांनी १९४५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निर्णय १९५३ मध्ये आला. त्यानंतरच येथे बांधकाम सुरू होऊ शकले. येथे गर्भगृह आणि भव्य भागवत भवनाचा जीर्णोद्धार आणि बांधकाम सुरू झाले,. हे काम फेब्रुवारी १९८२ मध्ये पूर्ण झाले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला