
मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने कसोटी मालिकेला सुरूवात केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रबाडाने तोडले टीम इंडियाचे कंबरडे
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपल्या संघाला एक चांगली सुरूवात करून दिली आहे. एकीकडे अनुभवी कॅगिसो रबाडाने विकेट मिळवल्या तर दुसरीकडे पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज आंद्रे बर्गरने यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल यांच्या विकेट घेतल्या. दिवस संपेपर्यंत रबाडाने एकूण ५ विकेट घेतल्या आणि भारताचा स्कोर ८ बाद २०८ पर्यंत पोहोचवला. यात के एल राहुलने नाबाद ७० धावांची खेळी केली.
भारतीय संघाच्या फलंदाजांची अशी कामगिरी पाहून चाहते अतिशय नाराज झाले आहेत.टीम इंडियाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच मध्यम फळीतील सर्फराज खानला सामील करण्याची मागणी केली.
केएल राहुलचे जबरदस्त उत्तर
एकीकडे जेव्हा कॅगिसो रबाडाने जोरदार हल्ला करत भारतासाठी मोठमोठे विकेट मिळवल्या. तर दुसरीकडे क्रीझवर टिकून असलेल्या केएल राहुलने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने खालच्या फळीत आधी शार्दूल ठाकूर आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहसोबत महत्त्वाची भागीदारी रचत रबाडाच्या ५ विकेटचा जल्लोष कमी केला.
पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही. ५९ ओव्हरमध्ये ८ बाद २०८ धावा झाल्या होत्या. केएल राहुलने १०५ चेंडूचा सामना करताना १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. दुसरीकडी बाजी मोहम्मद सिराज सांभाळत होता. पहिल्या दिवशी भारताने २०० धावांचा आकडा पार केला.