दरवळ: लता गुठे
कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकिंग युनियन मॉरिशसअंतर्गत मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कोमसापचे १७वे आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन मॉरिशस येथे २ आणि ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कोमसापचे १०० सदस्य, पदाधिकारी या साहित्य सहलीसाठी मॉरिशसला गेलो.
सकाळी बरोबर ९ वाजता ज्ञानोबा तुकारामाच्या नामघोष करत, वाजत-गाजत ग्रंथदिंडीने सुरुवात केली. ९.३० वाजता उद्घाटन सत्राला सुरुवात झाली. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली मॉरिशस येथील उदयंगम साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाचे उद्घाटन भारतीय कला व सांस्कृतिक संचलनालयाचे अध्यक्ष माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मॉरिशसच्या भारतीय दूतावासाच्या हायकमिशनर नंदिनी सिंगला, मॉरिशस सरकारमधील हौसिंग तसेच लॅन्ड ट्रान्सपोर्ट व लाइट रेल्वेमंत्री ऑलन गानू, मॉरिशसचे मिनीस्टर ऑफ आर्ट अॅण्ड कल्चर मंत्री अविनाश तिलक, उपपंतप्रधान लीला देवी दुकून लाचूमान, कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मॉरिशस मराठी स्पिकिंग युनियन अध्यक्ष नितीन बाप्पू, अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष मॉरिशसच्या निशी हिरू होत्या. तसेच भारतातून गेलेले आमदार संजय केळकर, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नाट्यकर्मी अशोक समेळ, कोमसाप माध्यम सल्लागार जयू भाटकर, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, प्रा. दीपा ठाणेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे रोपटे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी ३० वर्षांपूर्वी लावले. कोकणातील लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी ही संस्था कोकणातील ७ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून अनेक शाखांमार्फत ही साहित्य चळवळ पुढे जोमाने वाटचाल करत आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा वटवृक्ष इतका मोठा झाला आहे, याची पोहोचपावती म्हणजे मॉरिशसचे साहित्य संमेलन. परदेशात पहिल्यांदाच साहित्य संमेलनाचा आस्वाद कोमसापाच्या १००
सदस्य पदाधिकाऱ्यांनी घेतला तो असा…
जेव्हा आम्ही साहित्य संमेलनाच्या सभागृहात पोहोचलो त्या वेळेला ग्रंथ दिंडीमध्ये तेथील अनेक लेखक साहित्यिक पारंपरिक पद्धतीने भारतीय पोशाख परिधान करून ग्रंथदिंडीमध्ये सामील झाले होते. ज्ञानदेव, तुकारामाचा नामघोष करत मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी सभागृहात पोहोचली. त्या वेळेला तेथील वातावरण पाहून असे क्षणभर वाटले नाही की, आपण विदेशात आहोत. या वेळेला केशवसुतांच्या कवितेतील सुभाषित वजा ओळी आठवल्या.
‘प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयार खोदा!’
या ओळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोगोवर आम्ही अनेक वर्षं वाचत आलो आहोत. याचा अनुभव तिथेही आला.
भारतातून जाताना आम्ही आमची पुस्तकं घेऊन गेलो, त्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांची भाषणे ऐकताना आम्ही भारावून गेलो. येथील साहित्यिकांनी मांडलेले विचार या हृदयाचे त्या हृदयाला पोहोचले आणि खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन हृदयंगम झाले. मराठी भाषेला मोठ्या प्रमाणावर लागलेले अमराठी वळण थांबवण्याची गरज आहे, असे विजय कुवळेकर, यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हटले.
साधारण १८८० च्या दशकात शेतमजूर म्हणून कामाच्या गरजेपोटी महाराष्ट्रातील अनेक भागांतून तसेच कोकणातून आमचे पूर्वज मॉरिशसला आले आणि त्यानंतर येथेच स्थायिक झाले. आता आमची पाचवी पिढी मॉरिशसमध्ये राहत आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी ही पिढी कार्यरत असून आपले पूर्वज महाराष्ट्रातील असून त्यांचा शोध घेऊन मराठी संस्कृती व भाषा जतन करण्यासाठी कार्य करीत आहोत. मराठी भाषेला मॉरिशसमधील अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळालेली असून, भाषा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मॉरिशस येथील मराठी स्पीकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बाप्पू यानी विचार व्यक्त केले. तेथील निशी हिरू, नितीन बापू, भालचंद्र तसेच त्यांच्या आधी मराठीचा प्रसार व प्रचार करणारे त्यांचे गुरू अशा अनेकांनी चर्चासत्र, परिसंवादात भाग घेऊन आपले विचार मराठीतून व्यक्त केले. तेथे मराठी संस्कृतीचे आणि भाषेचे संवर्धन करण्यासाठी ते कशा प्रकारे कार्य करतात, याचे उद्बोधन झाले.
संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अमेय रानडे यानी केले, तर आभार राहुल निळे यांनी मानले. यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद व मॉरिशसमधील मराठी बंधू-भगिनींनी महाराष्ट्राची परंपरा अधोरेखित करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये गणेश स्तवन, मंगळागौर, टाळ नृत्य, कोळीनृत्य अशा कार्यक्रमांनी सभागृहातील रसिक प्रेक्षकांचे मन वेधून घेतले. दुपारच्या सत्रात ‘मराठी भाषेचे जतन देशात व परदेशात’ यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाला वक्ते म्हणून डॉ. विनय सहस्रबुद्धे, वृषाली मगदूम, उषा परब, निशी हिरू, भालचंद्र गोविंद, किरून नाओजी मोईबीर आदींनी भाग घेतला. सूत्रसंचालन जयू भाटकर यानी केले. पहिल्या दिवशी शेवटचे सत्र कवी संमेलनाचे होते. त्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते. महाराष्ट्रातील व मॉरिशसमधील २५हून अधिक कवींनी यावेळी त्यांच्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्ष लता गुठे यांनी केले.
दुसऱ्या दिवशीच्या चर्चासत्रामध्ये तरुणांचा सहभाग होता. त्या प्रत्येकाच्या मनोगतातून मराठी भाषेबद्दल त्यांना असलेला जिव्हाळा, आत्मीयता अधोरेखित होत होती. आजची मुलं काय वाचतात? मराठीची सध्याची स्थिती, मराठी भाषेमध्ये इतर भाषेमधून शब्दांची झालेली सरमिसळ, जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठीच्या संवर्धनाचं आव्हान अशा अनेक मुद्द्यांवर विचार मांडले. मुख्य म्हणजे ग्लोबल जगात वावरणा•ऱ्या आजच्या तरुण पिढीला आपल्या मराठीबद्दल काय वाटतं? त्यांची भूमिका काय? सहभागी तरुणांनी यासंदर्भात लक्षवेधी मुद्दे मांडले.
यानंतर विशेष कार्यक्रम म्हणजे शिवाजी महाराजांवरील नाट्यप्रयोग. आमदार नितीन केळकर यांनी शिवाजीची भूमिका साकार केली, तर डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी संभाजीची भूमिका. याचबरोबर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नाट्यछटा जिवंत केली. हा नाट्यप्रयोग पाहताना संपूर्ण सभागृह भारावून गेलं. त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये काही पुस्तकं प्रकाशित झाली. यामध्ये भरारी प्रकाशाच्या चार पुस्तकांचा समावेश होता. पसायदानने दोनदिवसीय साहित्य संमेलनाची सांगता झाली. साहित्य संमेलनानंतर तीन दिवस साईड सीन व मॉरिशस पाहण्यासाठी मिळाले. यामध्ये स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर भटकंती, तिथला निसर्ग, मंदिरं, वस्तुसंग्रहालय, किल्ला अशा प्रकारे भटकंतीचा भरपूर आस्वाद घेतला.
एकूणच हे साहित्य संमेलन अनेक अर्थाने मराठीचा जागर ठरला. प्रत्येकाच्या मनामध्ये मराठी भाषेबद्दल असलेली अस्था, संस्कृती यांबद्दलचा जिव्हाळा दिसून आला. साहित्य विचारांची देवाण-घेवाण दोन्ही देशांतील मराठी प्रेमीमध्ये सातत्याने सुरू राहावी हे तेथील मंडळींचा जिव्हाळा, आपलेपणा, आत्मीयता या गोष्टींमुळे मॉरिशस येथील साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेले. मॉरिशसमध्ये मराठी भाषा बोलणारी माणसं कमी असली तरी मराठी संस्कृती जपणारी माणसं अधिक भेटली. तिथे ज्या पद्धतीने गणेश उत्सव, महाशिवरात्री, दीपावली हे सण, उत्सव कसे साजरे करतात हेही बसमधील गाईडकडून समजले. त्यांच्या पूर्वजांच्या हिंदू संस्कृतीबद्दल त्यांना आस्था व आत्मीयता आहे. तिथे हिंदू मंदिरे देवदेवतांच्या मूर्ती यामध्ये शिवालय, दुर्गा माता दत्तात्रय, साईबाबा कशा मूर्तींचा समावेश आहे ज्यांची ते पूजा करतात. कोकणातील बाल्यानृत्य २०-२५ मुलांनी जे सादर केले ते पाहून आम्ही सर्व थक्क झालो. हा आगळ्या-वेगळ्या लोककलेचाही आम्हाला तिथे आस्वाद घेता आला. या नृत्य प्रकाराने डोळ्यांचे पारणे फिटले. कारण एकच प्रकारचा ड्रेसकोड केलेली ही मुलं अतिशय तालबद्ध नृत्य सादर करत होती. त्यांचे गणपतीच्या नावाचे उच्चार, त्याचं संगीत, ताल, ठेका, त्यांचा उत्साह, ऊर्जा, आवेश आणि देवाप्रति भक्तिभाव सारंच लक्षवेधी होतं.
अतिशय साधेपणाने; परंतु वेळेचं काटेकोरपणे पालन करत सुनियोजित पद्धतीने हे दोनदिवसीय साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनातून खूप काही शिकायला मिळाले. भविष्यकाळातील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी या साहित्य संमेलनाची नक्कीच मदत होईल. हा विश्वास सोबत घेऊन आम्ही मायदेशी परतलो.
मॉरिशस हे खऱ्या अर्थाने पाचूचे बेट अनुभवायला मिळाले. तिथली माणसं, तिथला पाऊस, तिथला समुद्र, तिथली हिरवाई, उसाचे मळे तिथल्या मातीत फिरून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळाली.