pollution: दिल्लीनंतर मुंबईच्या हवेतही बिघाड!

प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर


मुंबई : मुंबईत वाढणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळ्यात शेकोटी पेटवण्यावरही बंदी घातली जाणार आहे. याबाबत लवकरच सुधारित नियमावली जाहीर करण्यात येईल. मागील 24 तासात दिल्लीप्रमाणेच मुंबईतील काही भागातील हवेची गुणवत्ता बिघडल्याचं चित्र आहे. सोबतच, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात देखील वायु प्रदूषणात भर पडली आहे. यामुळे दिवाळी, दसरा आणि फटाके विसरा, असं म्हणण्याची वेळ मुंबईवर आली आहे.


वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्याचा आरोग्यावर देखील परिणाम दिसू लागला आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अशातच, मुंबईत शेकोटीवर देखील बंदी घालण्यात आली असून पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलण्यात येणार आहेत. तसेच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.


मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी 15 दिवसांत स्प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर जागच्या जागी 'स्टॉप वर्क' नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना हिवाळ्यात सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे.


धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲण्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व 24 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घालण्यात येईल. यात नियम मोडल्याचे दिसल्यास रोख दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच कामबंद नोटीस देखील बजावण्यात येईल. त्यामुळे आता बांधकाम व्यावसायिकांना योग्य काळजी घेण्याची आणि नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच उघड्यावर कचरा जाळणे, तसेच शेकोट्या पेटवण्यास देखील बंदी घातली जाणार आहे.


दरम्यान, मुंबईसोबतच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील हवा बिघडली आहे. विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत गेले आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात, ही परिस्थिती आणखी वाईट होण्याची स्थिती नाकारता येत नाही.


हिवाळ्यात सोसायट्यांमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांकडून शेकोट्या पेटवल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने प्रदूषण वाढते. मुंबईत 2019 ते 2023 या कालावधीत ऑक्टोबरमधील प्रदुषण पातळीमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. जे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय घट दाखवत आहेत. गेल्या महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत मुंबईतील हवेच्या प्रदूषणात 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व