Sunday, July 7, 2024
Homeमहत्वाची बातमीResignations for Maratha Aarkshan : मराठा आरक्षणासाठी पदाधिकार्‍यांसह सरपंचांच्या राजीनाम्यांची मालिका

Resignations for Maratha Aarkshan : मराठा आरक्षणासाठी पदाधिकार्‍यांसह सरपंचांच्या राजीनाम्यांची मालिका

राज्यात पहिल्यांदाच महिला सरपंचांनीही दिला राजीनामा

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Rservation) मुद्दा आता चांगलाच तापला असून यावर अद्याप तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक (Maratha Andolak) प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे, तर एसटींची, गाड्यांची जाळपोळ असे प्रकारही घडत आहेत. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना (Political leaders) गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळेस ते पाणीही घेत नाही आहेत आणि उपचार करण्यासही त्यांनी नकार दिला आहे. दोन तीन वेळा विशेष विनंतीवरुन त्यांनी पाण्याचा फक्त घोट घेतला आहे. त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे मराठा समाज पेटून उठला आहे.

यानंतर मराठा आरक्षणासाठी आता राजीनाम्यांची (Resignations) मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे व्यवस्थेला एका प्रकारे धाक दाखवण्याचा प्रयत्न मराठा समाजाकडून केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आता माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला सरपंच आहेत.

मनोज जरांगे यांनी गावागावात उपोषण करण्याचे आवाहन केल्यानंतर आजपासून रांझणी भिमानगर येथे साखळी उपोषणाला सुरूवात झाली. प्राची सुरेश जाधव व मेजर संजय गोटणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील यांनी ही उपोषणाची घोषणा केली. त्यासोबतच गावच्या सरपंच महिलेने पदाचा राजीनामा दिल्याने आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला आहे.

बुरुडगाव येथील नऊ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा

अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरुडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी सामूहिक राजीनामा दिला आहे. ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीतून लोकनियुक्त सरपंच व ९ सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये सरपंच अर्चना कुलट, उपसरपंच महेश निमसे, सदस्य- सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डीले, अक्षय चव्हाण, नयना दरंदले, शीतल ढमढेरे, रुक्मिणी जाधव, रंजना कुलट यांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हदगावचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण हे पद स्विकारणार नाही, असं पत्र सोपवत आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर केजमधील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्यासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचाही समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -