माहेरपण...


  • सहजच : चन्द्रशेखर टिळक


काल सकाळी स्त्री आणि तिचे भावनिक माहेरपण याबाबत दोन अगदी टोकाचे अनुभव आले...
काल सकाळीच एका व्हॉट्सॲप गृपवर एका पुस्तकाचा परिचय वाचला. भारतीय मुलीचे परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलाशी लग्न होते. पुरुषी हेकेखोरपणे तिच्या वैवाहिक आयुष्याची परिणिती तिच्या हातून तिच्या नवऱ्याची हत्या करण्यात होते. या घटनेआधीचे तिचे वैवाहिक आयुष्य आणि या घटनेनंतरची तिची कायदेशीर लढाई या दोन्ही टप्प्यांत तिला आलेले अतिशय वाईट अनुभव हा या पुस्तकाचा गाभा आहे.



दुसरा अनुभव त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात आला...
शेगांवला भक्त निवासातून मंदिरात रिक्षाने येत होतो. दसरा होऊन गेला तरी शेगांवमध्ये चौका-चौकांत अजून नवरात्रीचे मांडव होते. त्या मांडवात देवी होत्या. त्यांची पूजा-आरती सुरू होती.



परवा संध्याकाळी आणि काल सकाळी काही घरातूनही आरत्यांचे आवाज येत होते. म्हणून सहजच रिक्षावाल्या वयस्कर काकांना त्याबाबत विचारले...
“काका, नवरात्र काय, दसराही होऊन गेला ना?”
“हो गेला की...”
“मग हे मांडव, या पूजा आणि आरत्या कशा काय अजून सुरू आहेत?”
“का? तुमचा काही विरोध आहे का त्याला?” इति काका.
“नाही हो. विरोध जरा सुद्धा नाही. पण असे कधी या आधी बघितलेले नाही म्हणून कुतूहल मात्र नक्कीच वाटले.”
त्यावर काका म्हणाले, “मग काही हरकत नाही. मी उत्तर देण्याआधी एक सांगा. तुम्हाला घरी लेकी-सुना आहेत का?”
“सून आहे. लेक नाही.”
“सून नेहमी तुमच्याबरोबरच राहते का?”
“नाही.”
“मग अशी सून सणवार म्हणून तुमच्याकडे आली, तर तिला सण व्हायच्या आधी परत जाऊ द्याल का?”
“नाही. पण त्याचा तुमच्या उत्तराशी काय संबंध आहे?”
“तेच तर सांगतो आहे. अनेकजण दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट विसर्जन किंवा देवी विसर्जन करतात. पण ते भावनिकदृष्ट्या बरोबर नाही.” काका म्हणाले.
“कळले नाही तुम्ही काय म्हणत आहात ते?” मी प्रश्नार्थक नजरेने म्हणालो.
“अहो, नवरात्रात आलेली देवी आपल्या घरातल्या लेकी-सुनांसारखी आहे. दसरा आपला महत्त्वाचा सण आहे. मग आलेल्या घरातल्या लक्ष्मीला... देवी, लेक, सून... सणाचे जेवल्याशिवाय कसे जाऊ द्यायचे?”
“पण दसरा तर परवाच होऊन गेला. कालचा दिवस होता की मधे?”
“साहेब, काल एकादशी होती. एकादशीचा उपास असतो. त्यादिवशी...”
“हो... माझी आजी म्हणायची घरातल्या सवाष्णीने उपासाच्या दिवशी प्रयाण करू नाही.”
“बरोबर... हेच कारण आहे. लाडा-कोडाच्या घरच्या सवाष्णी आहेत त्या! त्या काय उपासाचे पदार्थ खाऊन निघणार का प्रवासाला” काका म्हणाले.
“समजतंय...”
“आज आता द्वादशीला दुपारी उपास सुटेल. तिला खाता येईल-नेता येईल असे गोडधोड होईल. मग तिची पाठवणी...”
“खरं आहे.”
“काय आहे ना, कौतुक दोघांनाही हवे असते. हे लक्षात ठेवले की कर्तव्यही कौतुक ठरते.”
“पटले तुमचे म्हणणे...”
“साहेब, तुमची सून नक्की नशीबवान आहे याबाबतीत.”
“तुम्ही आत्ताच म्हणालात ना...”
योगायोगाने मी रिक्षात असतानाच सूनबाईचा फोन आला
आणि रिक्षावाले काका कौतुकाने हसत...!

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका