कोकणचा भोपळा मुंबईत… !

Share

माझे कोकण: संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, गारपीट किंवा अति उष्मा झाला की राज्यातील शेतकरी त्रस्त होतात. स्वत:च कष्टाने उभ्या केलेल्या बागायतीत बुलडोझर फिरवण्याचा आततायीपणा कोकणातील कुण्या शेतकऱ्याने कधी केला नाही. स्वत:च्या शेतीची, बागायतीची नासधूस केलेली आजवर कधीही घडलेलं नाही. उलट शेती बागायतीमध्ये जरी उत्पन्न कमी आलं तरीही त्याचा राग शेतात काढला जात नाही, हे कोकणातील शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. शेती बागायतीमधील नुकसान हे कोकणात असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रात असेल ते सारख्याच प्रमाणात होत असते.

कोकणात कधी आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी बागायतीत नुकसान होते. तर उर्वरित महाराष्ट्रात ऊस, कापूस, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, टोमॅटो, भाज्या या सगळ्यात केव्हा ना केव्हा नुकसान झालेलेच असते. कधीतरी अवकाळीचा फटका किंवा कडाक्याची थंडी कोकणातही असतेच; परंतु कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही फार आदळआपट न करता आलेल्या प्रसंगाला सामोरे जातो. कोकणातील शेतकरी काही गर्भश्रीमंत नाही. त्याचबरोबर तो कर्जबाजारीही नाही. नको तितकं कर्जाचं ओझं घेऊन इथला शेतकरी वावरत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला कोणी आळशी म्हटला तरीही तो कष्ट घ्यायचे, काम करायचं तेव्हा करतो. गरजेपुरतं नक्कीच शेतात राबतो. पूर्वी थोडच काम करायचे. कमी कष्ट घ्यायचे पण अलीकडे कोकणातील शेतकरी आयडियल शेती, बागायती करतोय. इथे मला कोकणातील शेतकरी आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी यांच्यामध्ये कोणतीही तुलना करायची नाही. तो माझा हेतूही नाही. उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी काही वेळा अनुकूल परिस्थितीत तर दुष्काळी भागात पाण्याची उपलब्धता नसतानाही ज्या प्रयोगशिलतेने कष्ट घेतले जातात ते निश्चितच कौतुकास्पद आणि आदर्शवत आहेतच. म्हणूनच उसाच्या शेतीतून पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी उभी राहिली, बहरली त्यातून शेतकरी आणि सामान्यांचे कौटुंबिक जीवन अधिक सुखकर झालं.

कोकणही आता बदलतंय. शेती क्षेत्रातही नवनवीन प्रयोग होत आहेत. कोकणातील भोपळा मुंबईच्या वाशी मार्केटला विक्रीला जातोय. ही न्यूज किती सुखावणारी आहे, याचे कारण भोपळ्याची आणि आजीबाईची गोष्ट आपण आपल्या बालपणी आजच्या पन्नाशीत, साठीत, सत्तरीत असणाऱ्या सर्वांनीच ऐकलेली आहे. म्हातारी आजी भोपळ्यात बसून कशी गेली असेल असा प्रश्न जरी आजच्या घडीला पडला असला तरीही आजीबाईंची भोपळ्यातून होणारी सैर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणातील भजनीबुवा संतोष कानडे यांनी आपल्या कोकणातून भोपळा मुंबईत पाठवला जातो. त्याचं पीक कसं घेतलं जातं याबद्दल भरभरून ते बोलत होते. कोकणातून आंबा, फणस, जांभुळ मुंबईला जातात हे माहिती होतं. त्यातही आंबा मुंबईत वाशी मार्केटला जातो, ही माहिती होती. फणस दरवर्षी वटपौर्णिमेला कोकणातून मुंबईत जातात; परंतु आता भोपळाही कोकणातून वाशी मार्केटला जातो. तो देखील मोठ्या प्रमाणावर जातो. या भोपळ्यासंबंधी मालवणी मुलखात एक वंदता होती.

पूर्वी कोणी मोठ्या प्रमाणावर भोपळ्याचं पीक घेत नव्हते. गुरांच्या गोठ्यावर, मांगरावर वेल सोडलेला असायचा. या सोडलेल्या वेलीला जे काही भोपळे धरायचे त्याचं कोणी कोकणात मार्केटिंगही करीत नव्हते की, काहीही जर भोपळे पाच-सहा आले तर शेजारी गावातल्या कोणालाही फुकटच दिले जायचे. आज कोकणातील बाजारातही भोपळ्याच्या ‘भेशी’ करून विकल्या जातात. गाववालेही पूर्वी सहज उपलब्ध असणारा भोपळा पाच-पन्नास रुपये देऊन विकत घेतात. हा बदल आता कोकणातील बाजारातही झालेला दिसून येत आहे. कोकणात भोपळा पीक घेता येईल हे सर्वांनाच माहीत होतं; परंतु त्याचं मार्केट आणि मोठ्या प्रमाणावर पीक घेऊन त्याची व्यवस्था करता येऊ शकते, हे कोल्हापूरचे दीपक कासोटे यांनी गडमठ ता. वैभववाडी गावी भोपळ्याची शेती केली आणि कोकणातून भोपळा मुंबईच्या बाजारात विकता येईल हे दाखवून दिले. सुभाष मर्ये, सिद्धेश वारंग अशा अनेक शेतकऱ्यांनी भोपळा पीक घेऊन वाशी मार्केटला पाठवले. चांगलं पीकही आलं आणि पैसेही मिळाले. भोपळा पीक घेताना पूर्णपणे एक व्यावसायिक म्हणूनच त्यात उतरलोय. त्याचा चांगला फायदाही होतोय, असे पियाळी गावचे संतोष कानडे यांनी सांगितलं.

कोकणातील शेती, बागायतदार केवळ आंबा, काजू, सुपारी पुरताच मर्यादित राहिलेला नाही. शेतकरी आता बांबूचीही लागवड करू इच्छितोय. कलिंगडाची लागवड करून त्यातूनही पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. भातशेतीतही संकरीत भात बियाण्यांतून चांगलं भातपीक घेण्याचा प्रयत्न तरुण शेतकरी करतात. फक्त हे सर्व आता अधिक प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. कोकणात पिकणाऱ्या प्रत्येक फळाला एक वेगळा स्वाद आणि टेस्ट आहे. आज मोठ्या शहरातील मार्केटमध्ये आंबा कोणताही आला तरीही कोकणातील हापूसची टेस्ट कुठल्याच आंब्याला येणारी नाही. कर्नाटक, गुजरातमधूनही आंबे बाजारात येतात. देवगड हापूसच्या नावावर त्याची विक्रीही होते. कोकणातील काही आंबा बागायतदारांनी कर्नाटक हापूस, कोकणचा हापूस म्हणून मुंबईच्या बाजारात नेल्याची चर्चा मुंबईच्या मार्केटमध्ये होती. असं असेल तर ही अतिशय गंभीर आणि आपणच आपलं प्रचंड मोठं नुकसान करणारी गोष्ट आहे. क्षणिक पैशांसाठी स्वत:च ‘स्वत्व’ विकण्याचा हा प्रकार आहे. ही चर्चा जर सत्य असेल तर भविष्यात असं काही घडणार नाही, याची काळजी कोकणातील सर्वच बागायतदारांनी घेण्याची आवश्यकता आहे. कोकणातील आजीबाईला गोष्टीतला भोपळा मुंबईच्या बाजारात जातोय, हे निश्चितच आनंददायी आहे. कोकणात भोपळा म्हाळवसात, ग्रामदेवतांच्या समराधनांमध्ये भाजीत दिसायचा. असाच तो देशभरातील अनेक बाजारपेठांमध्येही कोकणातील भोपळा दिसावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago