
तर जखमींच्या उपचाराचाही खर्च सरकार करणार
मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला शोक
मुंबई : मुंबईतील गोरेगांवसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आज पहाटे ३च्या सुमारास आगीची भीषण (Goregaon fire) घटना घडली. यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या भीषण आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. दरम्यान, या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, माझी तेथील पोलिस, आधिकारी यांच्याशी चर्चा सुरू आहे. मी माहिती घेत आहे. कागद आणि कापडामुळे आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट शेअर करत मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी नागरिकांवर सरकारी खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येतील, असे सांगितले आहे. तसेच मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.