मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांना पाठींबा देणा-या शिंदे गटातील आमदारांना चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी आलेली हक्कभंगाची कारवाई अद्याप प्रलंबित असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची आणखी एक नोटीस दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि हेतुआरोप केल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही नोटीस दिली आहे. राऊत यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याविरोधातही राणे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
राज्यातील आमदारांच्या अपात्रतेची (Disqualification of MLAs) सुनावणी लांबणीवर पडत असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाने ते वेळकाढूपणा करत असल्याचे आरोप केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आज दुपारी तीन आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत आणि दानवे सातत्याने विधाने करून विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राणेंनी केला आहे.
आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना राणेंनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, राऊत आणि दानवे सातत्याने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे विशेषाधिकार भंगाच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण विधिमंडळ सचिवांकडे पत्र लिहून केली. विधिमंडळ सचिवांनी राऊत आणि दावनेंविरोधातील प्रस्ताव स्विकारावा, कारण काही दिवसांपासून हे दोघे आणि उबाठाचे अन्य नेते विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकतात, त्यांच्याविषयी अपशब्द वापरतात, या सर्व बाबी विधानसभा नियमांच्या भंग करणाऱ्या आहेत, असे राणे म्हणाले.
ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे विधिमंडळाचे सर्वसर्वा आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याची जबाबदारी कोर्टाने त्यांच्यावर टाकली आहे. ते याबाबत कारवाई करत आहेत. मात्र, उबाठाचे हे नेते निर्णय आमच्या बाजूनेच द्या, असे सांगत आहेत. अध्यक्षांविरोधात अनुचित दबाव व प्रभाव टाकण्यात येत आहे. हा विधानसभा अध्यक्षांचा आणि पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे. त्यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, असे राणे म्हणाले.
यापूर्वी राऊतांनी विधानसभेला चोर मंडळ म्हटले आहे आणि आताही त्यांच्या सर्व हरकती, वक्तव्ये ही विधानसभा अध्यक्षांना प्रभावित करण्यासाठी केली जात असल्याचे ते म्हणाले.
आजच्या सामनातील सहकार महर्षीचे आख्यान या अग्रलेखातून गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. जे भाजपच्या गोटात जात नाही, त्यांच्या सहकारी संस्था, बँकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्या मोडीत काढायच्या हे सहकारी चळवळीचे नवे मार्ग भाजप राजवटीत तयार झाल्याचं अग्रलेखात म्हटलं. यावरही राणेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, ज्यांना सहकार क्षेत्राचा स माहिती नाही, बॅंका, कारखाने राहू द्या बाजूला, ज्यांनी साधी पानटपरी देखील चालवली नाही, ते देशाच्या सहकार मंत्र्यावर लिहितात, हे हास्यास्पद आहे.
अमित शाह हे वर्षानुवर्षे सहकार क्षेत्रात काम करतात. त्यांना दांडगा अनुभव आहे. देशाच्या इतिहासात आजवर कधी झालं नाही, ते सहकार मंत्रालय भाजप सरकारने पहिल्यांदा स्थापन केलं. त्यानंतर सहकार क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. आज आमच्यावर आरोप करणाऱ्यांच्या रक्तात संस्था डुबवणं इतकचं आहे. त्यामुळं राऊतांना शाहांवर बोलण्याचा अधिकार नाही, असंही राणे म्हणाले.
मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंनी बुडवली. प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचार आणि चोरी करणारे हे लोक आहेत. राऊतांनी पत्रचाळ घोटाळ्यात अनेकांना बेघर केलं. राऊत हा चोर आहे, तो ४२० आहे. उद्धव ठाकरेंनी स्विस बॅंकेत किती पैसे ठेवले हेही राऊतांनी अग्रलेखातून सांगावे, असा टोला राणेंनी लगावला आहे.
दिनांक २५ सप्टेंबर २०२३
प्रति,
मा. सचिव,
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
विधान भवन, नरीमन पॉइंट, मुंबई.
विषय : म.वि.स. नियम 274 अन्वये सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे यांच्याविरुध्द विशेषाधिकार भंगाची सूचना.
महोदय,
श्री. संजय राऊत, राज्यसभा सदस्य, यांनी नजिकच्या काळात मा. विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात पुढील वक्तव्ये केली.
1. ‘’संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?’’
2. ‘’आम्ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाय रहाणार नाही.’’
3. ‘’विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत.’’
श्री. अंबादास दानवे, वि.प.स., विरोधीपक्ष नेता, विधान परिषद यांनी मा. विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात पुढील प्रमाणे वक्तव्य केले.
‘’उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करीत आहेत.’’
मा. अध्यक्ष, विधानसभा यांच्यासमोर सध्या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्ये उपरोक्त दोन्ही व्यक्तींचे राजकीय हितसंबंध आहेत. या पार्श्वभूमीवर वर नमूद वक्तव्ये करुन त्यांनी मा. विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्याची कृती केली असून त्याद्वारे मा. विधानसभा अध्यक्षांचा व पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे.यांचे अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे व त्या अनुसार कारवाई करावी अशी मागणी करतो.
वर नमूद वस्तुस्थिती पहाता सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्काळ सुपूर्द करावे व ह्यावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे, ही विनंती.
आपला,
(नीतेश नारायणराव राणे)
वि.स.स.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…