
ज्यांनी मराठा आरक्षण दिलंच नाही, त्यांनी वल्गना करु नये
चित्रा वाघ यांचे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर बोचरे वार
गोंदिया : सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडू नये याकरता काहीही बरळणाऱ्या ठाकरे गटाच्या संजय राऊतांचे (Sanjay Raut) भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी वाभाडे काढले. 'सरकारचा अंत्यविधी आम्ही थाटात करु' असं विधान करत संजय राऊतांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. यावर चित्रा वाघ यांनीदेखील तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
"संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात," असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. 'मेरी माटी मेरा देश' (Meri Mati Mera Desh) या अभियानासाठी गोंदिया जिल्ह्यात आल्या असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांचे चेहऱ्यावर स्माईल आणणारं सरकार आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही टोला लगावला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या, या राज्यावर ४० वर्षे मराठा नेते राज्य करत होते. मराठ्यांना कोणी आरक्षण दिलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं ही सरकारची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्या अडीच वर्षात हायकोर्टात हे आरक्षण टिकवू शकलेले नाहीत, ज्यांनी कधी दिलंच नाही त्यांनी अशा वल्गना करु नये, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वीच चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचे उत्तर म्हणून जोकरचे कपडे पाठवले होते. एखाद्या नेत्याच्या शरीरावरुन टीका करणं हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे नेत्यांच्या टिवल्या-बावल्या करतात आणि महाराष्ट्रात लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे जोकर करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना जोकरचे कपडे आम्ही पाठवले, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले होते.