खरी शिवसेना कोणाची?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एका वर्षाहून अधिक दिवस झाले असले तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली लागलेला नाही. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या निकालात एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी असल्याचे स्पष्ट झाले असले तरी कोर्टाने १६ आमदारांचा प्रश्न मात्र विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी या प्रकरणी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट (Thackeray Group) या दोन्ही पक्षांकडून उत्तर मागितले होते. दोन्ही गटांनी आपापले उत्तर दाखल केले असून अखेर राहुल नार्वेकरांनी सुनावणीची तारीख जाहीर केली आहे.
खरी शिवसेना कोणाची, याचा फैसला आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर ते येत्या १४ सप्टेंबरपासून प्रत्येक आमदाराची सलग सुनावणी घेणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने परस्परांच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभेचे अध्यक्ष यानिमित्ताने दाखल झालेल्या विविध याचिकांवर यादिवशी सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेचे दोन्ही गटाचे आमदार एकत्र येणार असून वाद आणि प्रतिवाद करणाऱ्या आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. आता त्याचा निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता आहे.