गणेशोत्सवापूर्वी कामाला सुरुवात; पाण्याची समस्या दूर होणार
विजयदुर्ग : जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजना कामाचे भूमिपूजन गणेशोत्सवापूर्वी केले जाईल, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे.
विजयदुर्गासाठी नवीन नळपाणी योजनेतून ३० कोटी खर्चाची योजना मंजूर झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार मानण्यासाठी व त्यांनी केलेल्या प्रयत्नातून प्रत्यक्ष नळपाणी योजना साकारल्याबद्दल ६ सप्टेंबर रोजी नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सुजय धुरत, संयोजक, कोकण महोत्सव, यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. गणपती उत्सवापूर्वी सदर प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली,
तसेच विजयदुर्ग नळपाणी योजनेतून, महाळुंगे, पाटगांव, मणचे, पाळेकरवाडी, मुटाट, मौजे-वाघोटन, सौंदळ-वाडा-केरपोई, तिर्लोट, ठाकूरवाडी, पडेल, बांदेगाव, गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग या गावांसाठी तीन विभागवार तीन पाईप लाईन टाकण्यासाठी जवळ जवळ ३० कोटी खर्चाची योजना त्यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष साकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी कोकण महोत्सव संयोजक सुजय धुरत यांचे समवेत दिगंबर गणू गांवकर, गणपत (बाळ) मणचेकर, रशीद सोलकर, सुनिल ओसरम, अजय मणचेकर, अश्रप सोलकर आदी उपस्थित होते..
राणे यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला असून लवकरच हे काम सुरू केले जाणार असून वेळेतच काम पूर्ण होईल असेही प्रतिपादन नितेश राणे यांनी केले. लवकरच विजयदुर्ग येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे, मुंबईकर ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांनी नितेश राणे यांची आभार मानले आहेत.