दोष पोलिसांचा नाही, लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना वेशीवरच रोखा
जालना : राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जात आहे. ते फक्त आरक्षण आणि पुतळ्याचे राजकारण करतात. त्यांच्या नादी लागू नका, असा लाखमोलाचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची राज ठाकरे यांनी आज (दि. ४) भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व उद्भवललेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांना बळ देत या राजकीय नेत्यांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, असेही राज यांनी यावेळी आंदोलकांना सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जालनामध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला.
यावेळी राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले. ते म्हणाले की, काल (दि. ३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याचे राजकारण करू नका असे विधान केले आहे. त्यावर राज यांनी फडणवीस जर विरोधी पक्षात असते तर, काय केले असते असा उलटप्रश्न उपस्थित करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना नव्हे तर, त्यांना आदेश देणाऱ्यांना दोषी धरा
यावेळी त्यांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांना दोषी धरू नका. तर, त्यांना आदेश देणाऱ्यांना दोषी धरा असे म्हणत हेच आदेश देणारे सत्तेत असताना गोळ्या झाडतात आणि विरोधात असताना मोर्चे काढतात. त्यामुळे या नेत्यांच्या नादाला लागू नका, असा सल्ला राज यांनी यावेळी आंदोलकांना दिला. तसेच या मुद्द्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची चर्चा करू असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी स्वतःचा जीव गमावू नका
आरक्षणाचा तिढा कोर्टात आहे. काही गोष्टी कायद्याच्या बाजूने समजून घेणे आवश्यक आहे. मला इतर नेत्यांसारखं खोटं बोलता येत नाही. गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी स्वतःचा जीव गमावू नका, असेही राज यांनी यावेळी आंदोलकांना सांगितले. हे सगळे राजकारणी लोक तुमचा फायदा करुन घेत आहेत. चांगली मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हे कधी सतत तुम्हाला जातीचं आणि आरक्षणाचं आमीष दाखवून कधी सत्तेत तर कधी विरोधात येतात. जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा तुमच्यावर प्रेम असतं आणि सत्तेत गेल्यावर मारायला उठतात.
शासन आपल्या दारी कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह
जालन्यात येत्या ८ सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सराटी गावातील घटनेनंतर राज्य शासनाकडून हा कर्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, आता हा कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी लाठीहल्ला करण्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येण्यापासून रोखा असे आदेश आंदोलकांना दिले आहेत. त्यामुळे येत्या १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.