
हे काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
परभणी : आज परभणी शहरात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित आहेत. राज्यभरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परभणीच्या रस्त्यांचीही तीच गत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात व्यक्त झाले. शिवाय परभणीच्या शेतकर्यांसाठी आणलेल्या नव्या योजनांबाबतही ते बोलले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या अडीच वर्षांच्या काळात काही होऊ शकलं नाही. मात्र आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मी असा निर्धार केला आहे की, मागचा काळ मराठवाड्यासाठी दुष्काळाचा गेला पण यापुढे जाऊ नये याकरता वाहून जाणारं सर्व पाणी गोदावरीच्या खोर्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठीचा पहिला आराखडा एमडब्यूआरआरए (MWRRA) पर्यंत पोहोचला आहे. त्याला मान्यता मिळाली की दुसरा आराखडा तयार करुन लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
'जलयुक्त शिवार'मधून शेतकर्यांना दिलासा
'जलयुक्त शिवार' या योजनेमुळे परभणीला प्रचंड फायदा झाला आहे. बागायती शेती पिकू लागली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आता जलयुक्त शिवार २ ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा थेंब अन थेंब वाचवून शेतकर्यांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणे केलं जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं भाग्य पूर्णपणे बदलणारा शक्तिपीठ महामार्ग
पुढे ते म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे मोठं परिवर्तन घडलं आहे. नांदेड, परभणी समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या संदर्भात कामाला हे सरकार आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी गती दिली. लँड अॅक्विजिशनसाठी निधी उपलब्ध करुन दिला. या कामामुळे परभणीचं चित्र पालटणार आहे. एवढंच नव्हे तर नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं भाग्य पूर्णपणे बदलणारा हा महामार्ग असणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात उद्योग मिळण्याकरता आणि मार्केट येण्याकरता त्याचा उपयोग केला जाणार आहे.
परभणीचे रस्ते मुख्यमंत्र्यांना दाखवले की थोडे पैसै मिळतील...
परभणी शहरातील रस्ते खराब झाले आहेत, या गोष्टीची मला कल्पना आहे. पण काळजी करु नका. माझ्या लक्षात आलं की, परभणीचे रस्ते मुख्यमंत्र्यांना दाखवले की थोडे पैसै मिळतील असं इथल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वाटल्याने मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर हे खूप दूर उतरवण्यात आलं. पण हे रस्ते जरी नसते दाखवले तरी मुख्यमंत्र्यांचं परभणीवर प्रेम आहे. येत्या काळात परभणीचे चित्रदेखील पालटलेलं दिसेल. इथल्या रस्त्यांना काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये परिवर्तित करण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे. ठेकेदारांचं कामदेखील बंद केलं जाईल, असं आश्वासन यावेळी फडणवीसांनी दिलं.