Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीWamanrao Pai : आकार व संस्कार

Wamanrao Pai : आकार व संस्कार

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

माणसा-माणसांत जो भेद आहे तो फक्त दोनच ठिकाणी आहे. आकार व संस्कारामुळे हा भेद आहे. आकार व संस्कार दोन्ही वाईट नाही. आकार वाईट नाही व संस्कार वाईट नाही. आकार वेगळा नसेल, तर ओळखणार कसे? संस्कार नसेल, तर काहीच करता येणार नाही म्हणून आकार व संस्कार दोन्ही वाईट नाही. वाईट आहे ते श्रेष्ठ व कनिष्ठ हा भेदाभेद अमंगळ आहे. हे अमंगळ जाईल तेव्हा सर्व मंगल होईल, सर्व चांगले होईल, सर्व सुंदर सुरेख होईल, तिथेच स्वर्ग असेल. मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची इच्छा करतात, त्यांच्याइतके मूर्ख या जगात दुसरे कुणी नाही.

ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘मेल्यानंतर मोक्ष मिळती असे म्हणती ते अतिमूर्ख.‘ मेल्यानंतर स्वर्ग पाहिजे, मोक्ष पाहिजे असे म्हणणारे मूर्ख असतात. इथेच स्वर्ग निर्माण करा. नरक तो निर्माण होतोच आहे. तो वेगळा करायला नको. सगळी व्यसन, दारू, गर्द, गुटखा याने नरक इथेच निर्माण होतो आहे. दारू पिणारा नवरा बायकोला मारतो, मुलांना मारतो, बायको एका बाजूला रडत बसली आहे, मुले कोपऱ्यात घाबरून बसली आहेत याला काय संसार म्हणतात? हा असा संसार म्हणजे नरक झाला. यावर उपाय म्हणून जीवनविद्या सांगते की, “आनंद वाटा आनंद लुटा.”एकमेकांना सुखी करा. एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करायला लागलात, तर संसारात सुखच सुख. कुटुंबात सुखच सुख आनंदी आनंद. स्वर्ग व नरक हे मेल्यानंतर नाही, तर इथेच आहेत. स्वर्गात जायला नको व नरकात, तर नकोच नको. स्वर्ग व नरक हे इथेच आहेत हे लक्षात ठेवले, तर आपण आपल्या जीवनात बदल केला पाहिजे. जीवनविद्या म्हणजे काय? समाजपरिवर्तन करणे हे जीवनविद्येचे ध्येय आहे. हे जग सुखी कधी होईल? समाजपरिवर्तन होईल तेव्हा. आज समाजपरिवर्तन होत नाही कारण धर्माधर्मामध्ये अंधश्रद्धा खूप आहेत. त्यामुळे मानसिकता बिघडलेली आहे. सगळीकडे अंदाधुंदी झालेली आहे. स्वर्ग निर्माण कोण करतो? आपण. नरक निर्माण कोण करतो? आपण. म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सगळे आपल्या हातात आहे.

लहान मूल जन्माला आले की, त्याला तू माणूस आहेस हा पहिला संस्कार करा. सगळी तुझी भावंडे आहेत, हा संस्कार करा. हिंदू धर्मात हा संस्कार आहे, पण त्याचे पालन लोक करत नाहीत. मुस्लीम धर्मात हा संस्कार आहे, पण त्याचे लोक पालन करत नाहीत. बौद्ध धर्मात हा संस्कार आहे, पण त्याचे लोक पालन करत नाहीत. बुद्धांनी सर्व चांगले चांगले सांगितले पण त्याचे पालन कोण करतो? धर्म एक सांगतो व त्याचे बहुतांशी अनुयायी भलतेच काहीतरी करत बसले आहेत. जगातल्या कुठल्याही धर्माला दोष देण्याचे कारण नाही. दोषी आहेत ते अनुयायी. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले माणसे वाईट नाहीत, वाईट आहे ती वृत्ती.“जे खळांचे व्यंकटी सांडो.” कुठलाही धर्म वाईट नाही. अमंगल आहे ते श्रेष्ठ व कनिष्ठ. हे कधी होते? हे संस्काराने होते, यासाठी संस्कार चांगलेच पाहिजेत. हे संस्कार चांगले करायचे की न करायचे हे तू ठरव म्हणून तूच आहेस ‘तुझ्या जीवनाचा शिल्पकार’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -