Kalgitura : ‘कलगीतुरा’ अभिजात लोककलेचा समृद्ध अनुभव

Share
  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

कलगीतुरा या नाटकाविषयी लिहिण्याअगोदर प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल, तो नॅशनल सेंटर फाॅर परफाॅर्मिंग आर्ट्स या संस्थेचा. ८०च्या दशकात नाटकांसाठी विविधांगी उपक्रम राबवणारी ही संस्था गेल्या १०/१५ वर्षांत मराठी रंगभूमीसाठी नेमके काय कार्य करते? हा प्रश्नच पडलेला असे. ९०च्या दशकात तर एनसीपीए सर्व रंगकर्मींसाठी मानाचे स्थान होते. बुद्धिवाद्यांचे आश्रयपीठ होते, अभ्यासकांसाठी प्रेरणास्त्रोत होते; परंतु गेल्या काही वर्षांत मराठीतून संशोधनाच्या पायावर उभी राहील अशी एकही मराठी नाट्यकृती पाहण्यात आली नव्हती. कलगीतुराच्या निमित्ताने ती पाहावयास मिळाली. त्याबद्दल एनसीपीएचे नाट्यविभाग प्रमुख ब्रुस गथ्री आणि मराठी नाट्यविभागाच्या निर्मात्या जयश्री शिंदे यांचे अभिनंदन करावयास हवे. साधारणतः एक वर्षापूर्वी नाट्यलेखन कार्यशाळे अंतर्गत विविध लोककलांसंबंधी प्रयोगायोग्य संहिता एनसीपीएने मागवल्या होत्या. त्यावर चर्चा, संस्कार व अभिजात देखणेपण या निकषांयोगे अंतिमतः ७० पैकी ५ संहिता प्रयोगायोग्य ठरल्या. दत्ता पाटील लिखित ‘कलगीतुरा’ हे नाटक त्यापैकी पहिली संहिता होय. ‘कलगीतुरा’ हे लोककला अधोरेखित करणारे संशोधित नाट्य आहे. सर्वसामान्य व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन रचलेले बेतलेपण यात नाही. त्यामुळे कलगीतुरा म्हणजे काय? हे आधी लक्षात घ्यावे लागेल. यात दोन पक्ष असतात, त्यात एकास कलगी तर दुसऱ्यास तुरा असे संबोधले जाते. याचे सादरीकरण म्हणजे दोन पक्षातील सवाल-जबाबी झगडा असतो. शाहिरी परंपरा लाभलेले सवाल-जबाब काव्य, लावणीपद्धतीने पेश होताना हिंदू जीवनपद्धतीशी सामावलेले आपणास दिसून येईल.

‘कलगी’ म्हणजे तुळशीच्या मंजिऱ्यांसारखा आणि ‘तुरा’ म्हणजे मक्याच्या कणसातील केसांसारखा. कलगीवाले हे शक्तिवादी अथवा प्रकृतीवादी आणि तुरेवाले हे पुरुषवादी किंवा शिववादी समजले जातात. कर्नाटक तामिळनाडूत कलगीवाले हे शैव आणि तुरेवाले हे वैष्णव असा समज आहे. राजस्थानात तर कलगीवाले हे मुसलमान आणि तुरेवाले हे हिंदू असतात. मात्र यातील काव्य हिंदू तत्त्वज्ञान, अाध्यात्म आणि तिथल्या जीवन पद्धतीवरच आधारलेले असते. प्रस्तुत नाटकात ही जीवन पद्धती नाशिक तथा नजीकच्या पंचक्रोशीतली आहे. रामजोशी, अनंत फंदी हे शाहिर तुरेवाले आणि प्रभाकर, होनाजी, पठ्ठेबापूराव हे कलगीवाले समजले जातात. त्यामुळे दोघांच्या कवनांमधील फरक अभ्यासकास सहज समजून घेता येतो. प्राचीन परंपरा असलेले हे शाहिरी काव्य असून मराठेशाहीत ते बहरास आले.

१७९४ ते १८५४ या काळात म्हणजे पेशवाईच्या उत्तरकाळात पंढरपूरच्या वारीस जाताना तमाशातील स्त्री जातीची विटंबना पाहून हैबतीबुवांनी तमाशाचे शृंगारिक रूप बदलून तमाशा अध्यात्मिक करमणुकीचा प्रकार करावा, असे ठरवले आणि तमाशाचा परंपरागत ढाचा कायम ठेवून त्याचे स्वरूप बदलले. अाध्यात्म, शृंगार आणि त्यातून लोकरंजन हे या नव्या तमाशाचे विशेष होते. या नव्या रूपास समाजातील विविध स्तरांतून मान्यता मिळाली आणि कलगीतुराला लोकाश्रय लाभला. अगदी अलीकडे म्हणजे १९९०-९५ पर्यंत कलगीतुरा हा लोककला प्रकार खेडोपाडी सादर होताना दिसत असे; परंतु दूरदर्शनने केलेले अतिक्रमण आणि नव्या पिढीचा चंगळवादाकडे असलेला ओढा यात कलगीतुरा लोप पावत गेला.

या स्थित्यंतराची गोष्ट दत्ता पाटलांनी अचूकपणे विविध प्रसंगातून मांडलेली आपण या नाटकात पहातो. लोककलाप्रकार हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असताना त्यात कालानुरूप बदल होणे अपरिहार्य आहे. मात्र तो कला प्रकार लयाला जाण्यासारखे दुःख नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर बहुजनांनी अथवा समाजातील विशिष्ट जाती-प्रजातींनी लोककला प्रकार जिवंत ठेवले. मात्र यात उच्चभ्रू ९६ कुळी असूनही कलगीतुरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

कलगीतुरा जत्रेच्या, सणासमारंभाला जसा सादर केला जातो, तसाच तो मयताच्या जागरणाचेही काम करतो. ही परंपरा खेडोपाडी जपली गेली आहे आणि याच संदर्भाचा धागा पकडून कलगीतुऱ्याचे कथानक सादर होते. एखाद्या गावात संध्याकाळचे मयत झाल्यास रात्री दहन करण्याऐवजी नातेवाइकांची वाट पहात रात्र कलगीतुऱ्याच्या संगतीने जागवली जात असे. तोवर मयताघरच्या लोकांना धीर देणं, त्यांचे सांत्वन करणं आणि प्रामुख्याने मयताच्या आत्म्याला साथ करणं यातील मंडळी अध्यात्मिक लावण्यांनी, गौळणींनी गायन पद्धतीने सादर करीत असत. नाटकात अशाच एका कुटुंबाची सत्यकथा मांडण्यात आली आहे. तपशिलात थोडाफार बदल करून दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी प्रयोगायोग्य केलेली कलगीतुऱ्याची संहिता विविध मानवी आकृतीबंधातून प्रेक्षकांच्या मनाची पकड घेते.

एका गावकऱ्याच्या घराचे बांधकाम सुरू असताना खोदकामात एक ट्रंक (लोखंडी पत्र्याची पेटी) सापडते. ट्रंकेत त्या कुटुंबातील पूर्वजांनी रचलेल्या लावण्यांचे बाड सापडते. घरमालक त्या लावण्यांचे संदर्भ धुंडाळत व गावातील ज्या कुटुंबांना कलगीतुऱ्याचा वारसा आहे, अशा तरुण पिढीला एकत्रित करून पुन्हा एकदा कलगीतुऱ्याचा फड उभारतो व पहिली साथ गावातल्या एका मयताच्या घराला करतो, अशा स्वरूपाचे सुटसुटीत कथानक आपण अनुभवत राहतो. नाटकाच्या प्रारंभी कथासूत्रानुरूप कलगी आणि तुऱ्यातील शाहिरांकडून गण सादर होतो आणि कथानकास रितसर सुरुवात होते. शाहीर सखारामाचे पात्र साकारणारे हेमंत महाजन व त्यांचे सहकारी ऋषिकेश पाटील, ऋषिकेश शेलार, विक्रम ननावरे, कृष्णा शिरसाठ, शुभम लांडगे व प्रवीण जाधव आपल्या खड्या आवाजात बाजी मारून नेतात. मध्यांतरावेळची आलापी तर काळीज चिरत जाते. समूहनाट्यासाठी उपयुक्त असलेले आकृतीबंध आणि प्रसंगांत होत जाणारे बदल हे सचिन शिंदे यांच्या दिग्दर्शकीय कलाकुसरीची साक्ष देतात. काही गोष्टी मात्र निर्मिती मूल्यानुसार फारच बाळबोध वाटत रहातात. उदा. लेखकाने कलगीतुरा हा लोककला प्रकार समजविण्यासाठी राधा (श्रुती कापसे) या पात्राचे केलेले प्रयोजन. मान्य कि ते पात्र प्रश्न मांडत जाते आणि शाहीर तिला उत्तरे देत जातात; परंतु हा फाॅर्म आता कालबाह्य झालाय. मुळात नाटकाच्या फाॅर्ममध्येच जर सवाल जबाबाचे प्रयोजन आहे, तर कलगीतुऱ्याच्या अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे प्रश्न रिपीट झाल्यागत वाटतात. नाटकाच्या सुरुवातीपासूनच आपण काहीतरी इन्फर्मेटिव्ह स्टफ बघायला मिळणार या मोडमध्ये गेलेले असतानाच या पात्राची एन्ट्री काहीशी डिस्टर्ब करून जाते. बरं त्या पात्राचा कथासूत्राशी सुतराम संबंध नसल्याने चांदीच्या ताटात करवंटीत वाढलेली खीर, अशी अवस्था होते. कदाचित सर्वसामान्य प्रेक्षकांचा बौद्धिक कल विचारात घेऊन निर्माण केलेले हे पात्र प्रयोजन असू शकते. दुसरी न पटलेली गोष्ट म्हणजे कलगीतुरा हा फ्री फाॅर्म आहे. आपण ज्या पद्धतीने स्ट्रीट प्ले (पथनाट्य) पाहतो तसाच कलगीतुऱ्याचा प्रेक्षकवर्ग सादरकर्त्यांच्या किमान तीनही बाजूंना बसलेला असतो. एनसीपीएच्या नाट्यगृहात ही सोय असूनही केवळ समोरच्या प्रेक्षकांसाठी हे नाटक का सादर केले जाते? हा उत्तर न मिळू शकलेला प्रश्न होता, अर्थात या सूक्ष्म दिग्दर्शकीय बाबी असून त्या सादरीकरणातल्या चुका नव्हेत, हेही तितकेच खरे.

प्रकाशयोजना ही या नाटकातील विशेष लक्षवेधी कामगिरी आहे आणि त्यासाठी प्रणव सकपाळे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. बॅटरीच्या प्रकाशातले चेहरे, ट्रंकेमध्ये पूर्वापार म्हटल्या जाणाऱ्या लावण्यांचा खजिना सापडल्याचा प्रसंग, मयताच्यावेळचा भकासपणा किंवा अगदी मोबाइलवर बोलताना केवळ मोबाईलच्या प्रकाशात दिसणारे चेहऱ्यावरचे भाव, अशी अनेक उदाहरणे यात देता येतील. ऋषिकेश शेलार यांचे संगीत आणि रोहित सरोदे यांचे संगीत संयोजन कलगीतुऱ्याचा आत्मा आहे. काही कवनांच्या चाली पारंपरिक असल्याने लक्षात राहतातच; परंतु नव्याने बांधलेल्या रचना पारंपरिकतेत बेमालूम एकजीव झाल्यात. नेपथ्य आणि वेशभूषा अनुक्रमे चेतन बर्वे व कविता देसाई यांची असून नाटकास पूरक अशीच आहे.

आज एनसीपीए आणि आयएनटी या दोनच संस्था लोककलेबाबत संशोधन आणि त्याचा परामर्श सादर करताना दिसतात. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून लोककला जतन व संवर्धनाची अपेक्षा करताही येईल मात्र तिथेही निधी अभावे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणास मर्यादा निर्माण झालेल्या आपण पाहतो आहोत. एनसीपीएच्या या निर्मितीत विशेष उल्लेख करावा लागेल तो मराठी नाटकांची जबाबदारी असलेल्या जयश्री शिंदे यांचा. सध्याच्या पोस्टकोविड काळात नाट्यनिर्मिती ही तारेवरची कसरत होऊन बसली आहे. नाशिक आणि आसपासच्या आडगावातून अभिजन रंगकर्मी एकत्र जमवून त्यांची मोट बांधून कलगीतुऱ्यासारख्या नाटकाची निर्मिती हे शिवधनुष्य उचलण्यागत आहे आणि हे शिवधनुष्य बुस गथ्री व जयश्री शिंदे या दोघांनी लीलया पेलले आहे. पुढील काळात अशाच उत्तमोत्तम नाटकांची निर्मिती मराठी रंगभूमीला सर्वार्थाने समृद्ध करेल, यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

4 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

44 minutes ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

55 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

60 minutes ago

IPL 2025: शुभमन गिल लग्न करतोय? आयपीएलमध्ये प्रश्न विचारल्यावर गिल लाजला आणि म्हणाला…

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…

2 hours ago