Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीSharad Pawar : देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला

Sharad Pawar : देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला

पुणे : अलिकडच्या काळात या देशाने आणि जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते. पण लाल महालात शायिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या (Shivaji Maharaj) काळात झाला, ही गोष्ट कोणी विसरु शकत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवाजी महाराज यांचा गौरव केला.

लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) स्मृतिदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते.

यावेळी सुरूवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून दिली. शरद पवार म्हणाले, या देशात पुणे शहराला अनोखे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व जगाला माहित आहे. शिवाजी महाराजांचा जन्म या जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे शहरातील लाल महालात त्यांचं बालपण गेलं. या देशात अनेक राज राजवाडे होऊन गेले. त्यांच्या नावाने त्यांची संस्थाने ओळखली जात. मोगलचे दिल्लीचे संस्थान असेल किंवा देवगिरीच्या यादवांचे संस्थाने असतील. अनेकांची संस्थाने या देशात होऊन गेली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे दुस-याचे राज्य नव्हते, तर स्वतःच्या बळावर उभारलेले राज्य होते. ते रयतेचे हिंदवी स्वराज्य होते. अलीकडच्या काळात देशाच्या रक्षणासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते. मात्र जेव्हा लाल महालामध्ये शायिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी तो प्रयत्न हाणून पाडला. तो देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवाजी महाराज यांचा गौरव केला.

तसेच त्यानंतरच्या काळात जेव्हा देश इंग्रजांच्या ताब्यात गेला, त्यावेळी लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा दिला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेत केसरी नावाचे वृत्तपत्र सुरु केले आणि इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. ब्रिटिशांच्या गुलाम गिरीतून बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला एकत्र येऊन लढावे लागेल, असे ते म्हणायचे. वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी स्वराज्याची मशाल पेटवली, वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिशांवर प्रहार केला. त्यावेळी ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देण्याचे काम टिळकांनी केलं, जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक या दोघांचे योगदान विसरू शकणार नाही.

टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारक समितीने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह अशा अनेक मान्यवरांची निवड झालेली आहे. या मान्यवरांच्या पंक्तीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला, याचा सर्वांना आनंद झाला. म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -